Tuesday 14 July 2015

सार्वजनिक गणेशोत्सव ,उच्च न्यायालयाचा आदेश आणि राज्य शासनाचा धोरण लकवा --------धनंजय जुन्नरकर

सार्वजनिक गणेशोत्सव ,उच्च न्यायालयाचा आदेश आणि राज्य शासनाचा धोरण लकवा 
                                                                          --------धनंजय जुन्नरकर 
                                                                     मुंबई काँग्रेस सचिव ९९३००७५४४४




सार्वजनिक उत्सवांच्या नावाखाली रस्त्यावर मोठे मंडप टाकून कानठळ्या बसतील अशा  प्रकारे स्पीकर वाजविणाऱ्या काही अति उत्साही लोकांपायी मा .उच्च न्यायालयाने सगळ्यांनाच धारेवर धरले असून त्यांनी दिलेल्या आदेशामुळे  सर्व उत्सवच धोक्यात आलेला आहे .  
ठाणे येथील डॉ महेश  बेडेकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर निकाल देताना मा .उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी काही निर्बंध घातले आहेत . मांडव पदपथावर असू नयेत , वाहतुकीला अडथळा घालतील असे असू नयेत ,शाळा ,महाविद्यालय ,बस थांब्याच्या जवळ असू नये ,ध्वनी प्रदूषण करू नये . जर मंडळांनी हे केले तर त्यांना परवानगी देण्याऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल . महापालिका आयुक्तांचा विशेष अधिकार देखील काढून घेण्यात आलेला आहे . 
सदर आदेश मा.  न्यायालयाने मार्च महिन्यात दिलेला असून दोन महिन्यात सर्व धोरणात्मक निर्णय घेण्याचा आदेश राज्य शासनाला देण्यात आला होता, परंतु पाच महिने झाले व गणपती उत्सव जवळ आला तरी शासनाने काहीच हालचाल केलेली नाही . 
राज्यात शिवसेना आणि भाजपा युतीचे सरकार सत्तेवर आहे . दर लहान सहान गोष्टींमध्ये हिंदू धर्मियांचा पुळका फक्त आपल्यालाच असा आव आणणारे सत्तेतील नाटकी पुढारी कोठे गायब झाले आहेत काही कळत  नाही . मुंबई मध्ये  ११,०००  सार्वजनिक मंडळे आहेत . न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांच्या संघटनेने मुख्यमंत्र्यांना त्याबाबत पत्र देखील लिहिले . निर्णय घेताना आम्हालाही  विचारात घ्या असे लेखी दिले तरी  मा . मुख्यमंत्र्यांच्या कडून काहीच उत्तर नाही . 
महाराष्ट्रात गणपती उत्सव हा प्रमुख उत्सव आहे . गणपती हे  महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे . सामान्य भाविक या बाबत  फार संवेदनशील आहे . त्यामुळे हा प्रश्न गांभीर्याने आणि तातडीने सोडविण्यासाठी शासनाने प्रयत्न करायला पाहिजे होते परंतु तसे झालेले नाही , त्यामुळे ऎन उत्सवात काहीतरी विपरीत घडावे व तणाव निर्माण व्हावा आणि लोकांचे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून लक्ष दुसरीकडे जावे यासाठी सरकार हा खेळ खेळत असावी असा संशय येत आहे . 
सार्वजनिक उत्सव मैदानात साजरे करायला गेले तर तेथे ही जनहित याचिका दाखल केल्यामुळे उत्सव साजरे करता येत नाहीत . रस्त्यावरही  करायचे नाही मग नक्की कुठे करायचे याचे उत्तर राज्य शासनाने न्यायालयाकडे मागीतले पाहिजे होते ,परंतु तसे होताना दिसत नाही . सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशा प्रमाणे रस्त्यावर प्रार्थना करणे हा काही मुलभूत अधिकार नाही . त्यामुळे धर्म आचरणाखाली नागरिकांना आक्षेप घेता येणार नाही . " राजाने मारले आणि  पावसाने झोडपले " तर जायचे कुणाकडे अशी जनतेची अवस्था झाली आहे . 
भव्य निरर्थक रोषणाई ,लाखो रुपयांच्या ढोल - ताश्याच्या सुपाऱ्या ,कर्ण कर्कश्श गाणी ,मंडपाच्या मागे  चाललेले जुगार ,दारू पिऊन नाचणे या बाबी काही ठिकाणी प्रकर्षाने आढळून येत आहेत . पण त्यामुळे सर्व मंडळांना त्याची शिक्षा करणे योग्य होणार नाही . " मुसलमानांनी त्यांचे रस्त्यावर नमाज पढणे  थांबवावे मग आम्ही देखील रस्त्यावर गणपती मंडप बांधणार नाही  " अशी आव्हानबाजी सुरू झालेली आहे . त्यावरून  शासनात बसलेल्या लोकांना  हे प्रकरण कोठे न्यायचे आहे याचा अंदाज करायला कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही . 
मुसलमानांना मशीदी बांधायला परवानग्या द्यायच्या नाहीत ,त्यांना हिंदूंच्या गृह संकुलात राहायला द्यायचे नाही . त्यांच्या जुन्या मशिदींना वाढीव चटई क्षेत्र दयायचे नाही , मग त्यांनी जागे अभावी रस्त्यावर नमाज पढला तर आम्हीही रस्तावर "  महाआरती " करणार असा दम मारायचा . असे राजकारण शांततेला मारक ठरते . सतत भावनेवर आधारीत राजकारण करायचे हे जर धोरण असेल तर राज्याला पुरोगामित्व विसरावे लागेल की काय ? असा प्रश्न सामान्यांना पडला आहे . बोगस डिगऱ्या  , चिक्क्या वाटप ,आणि मदरशांचा शैक्षणिक दर्जा काढून घेण्याच्या बहुमुल्य कामातून सरकारला कधी वेळ मिळणार आणि मा. मुख्यमंत्री परदेशी दौरे कधी संपविणार या कडे महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे .   
हिंदूंनी कशा प्रकारे इतरांना बाधा न आणता उत्सव साजरा करावा या बाबत भगव्या विचार धारेकडून कोणतेही  "व्हिजन (नसलेले )डॉक्युमेंट " आज पर्यंत तरी समोर आलेले नाही .  सरकारचे जाहीरनामे- वचननामे कोणत्या रद्दीच्या दुकानाची  शोभा वाढवत आहेत हेही शोधावे लागेल . 
मा.  उच्च न्यायालयानेही सार्वजनिक उत्सव म्हणजे नक्की काय ?याची व्याख्या करायला हवी . कारण सर्व लोकांच्या घरात गणपती येत नाहीत , नवरात्र उत्सव होत नाही , दही हंडी घरात फोडता येणार नाही . लोकांना या उत्सवात सहभागी होण्यासाठी काय करावे याची मार्गदर्शक तत्वे कोणी सांगायची ? आजचे सार्वजनिक उत्सव लोकमान्य टिळकांनी सांगितल्या प्रमाणे साजरे होत नाहीत हे कबूल ,परंतु ते टिकले पाहिजेत व पुढच्या पिढीला आपली संस्कृती कळली पाहिजे याच्या साठी धोरणात्मक निर्णय घ्यायला शासनाला कोणी बंदी घातली आहे काय ?  त्यांच्या वर्तनाला धोरण लकवा आला आहे असे मानावे काय ?


                                                                         --धनंजय जुन्नरकर 
                                                        मुंबई काँग्रेस सचिव ९९३००७५४४४

No comments:

Post a Comment