Friday, 19 April 2019

*पंतप्रधान ते चौकीदार एक अपयशी प्रवास* !



*पंतप्रधान ते चौकीदार एक अपयशी प्रवास* !

16 एप्रिल ला लोकसत्ता मध्ये पहिली बाजू ह्या सदरात भाजपचे सरचिटणीस राम माधव ह्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांची वारेमाप स्तुती करणारा " लोकांसाठीच पंतप्रधान !" हा लेख वाचला , त्या लेखावरील मुंबई काँग्रेस ची प्रतिक्रिया खालील प्रमाणे.


राम माधव ह्यांनी आपल्या लेखात मोदी ह्यांची तुलना ज्युलियस सीझर शी केली आहे. सीझर ने आपले नेतृत्व गुण दाखवून दिले त्याच प्रमाणे मोदीजी समाजमनावर आपली छाप दाखवून देत आहेत असे माधव म्हणतात.
ह्याच सीझर ला विरोधी मत प्रदर्शित करणारे आवडत नसत. त्यांना देशोधडीला लावण्याचे कार्य सीझर ने दडपशाही ने केले. मोदी सरकार चे काही लोक , व भाजपा संघटनेतील काही लोक इतरांना वारंवार पाकिस्तान मध्ये जाण्याची सूचना करत असतात.
सीझर ने स्वतःच्या सिनेटरांवर  प्रचंड दहशत ठेवली होती, तशीच दहशत आज आपल्याला दिसून येते.सीझर हा इतर सिनेटर्स पेक्षा खूप वरच्या पातळीला जाऊन हुकूमशहा बनू पाहात होता. त्याने त्यांच्या नाण्यावर एका बाजूला रोमन देवता तर दुसऱ्या बाजूला स्वतःचे चित्र छापले होते.
आता जर पुन्हा ,"मोदी सरकार" आले तर ,
जशी एका रात्रीत नोटबंदी करून मनमानी करून देशाच्या अर्थव्यवस्थेला खोल दरीत ढकलले होते तसे नोटांवर स्वतःचे फोटो छापायचे निर्णय देखील एका रात्रीत घेतील.
राम माधव म्हणतात प्रशियातील रणनीतीकार व महान योद्धा कार्ल व्होन क्लोजव्हीट्झ ह्यांनी " नेहमी बलवान "असणे हीच " उत्तम रणनीती असल्याचे सांगितले आहे.  बलवान असणे हे केंव्हाही चांगलेच परंतु बलवान असणे हे काही वैयक्तिक बलवान असणे नाहीए.
लोकशाही बलवान करावी लागेल, सहिष्णूता बलवान करावी लागेल स्त्रियांना , बेरोजगारांना, शेतकऱ्यांना बलवान करावे लागेल. पोलीस, न्याय ,पत्रकारिता देशाच्या स्वायत्त संस्था बलवान कराव्या लागतील. मोदी सरकार ने ह्याच्या सर्व विरुद्ध केले असून संस्था नष्ट करण्याचे कार्य अविरत चालू आहे. ह्यांच्या राज्यकरभारामुळे 8-10 उद्योग पती बलवान झाले.जे फार लवकर बलवान झाले ते त्वरित देश सोडून पळाले.  देशाला व्यक्ती केंद्रित बलवानता नको आहे. जनतकेंद्रीत प्रजासत्ताक हवे आहे.शासक बलवान झाला की तो हुकूमशहा होतो.
भाजपाला मोदींची हुकूमशाही हवी असू शकते परंतु देशाला ती परवडणार नाही.
"मोदींवर गांधीजींच्या विचारांचा प्रभाव आहे " हा राम माधव ह्यांनी ह्या "शतकातील सर्वोत्तम विनोद" केलेला आहे.
वारंवार भाजपच्या वरीष्ठ पातळीवर च्या नेत्या प्रवक्त्यांना गांधीजींच्या मागे लपायला जावे लागते हा भाजपा वर काळाने उगविलेला सूड आहे.
आयुष्य भर कुजबुज चळवळीच्या माध्यमातून गांधीजींना शिव्या दिल्यावर आता त्यांच्या मार्गाने जायचे आहे हे वाक्य जेंव्हा गांधीजी स्वर्गात बसून ऐकत असतील तेंव्हा ते निश्चित हसतील . त्यांचे ते हास्य हे मोनालीसाच्या जगप्रसिद्ध चित्रातील हास्यापेक्षाही सुंदर आणि निखळ असेल.

मोदींच्या चौकीदार मोहिमेमुळे सामान्य माणसाच्या कष्टाला प्रतिष्ठा प्राप्त झाल्याची लोणकढीची थाप राम माधव मारून मोकळे होतात.
हा देश सामान्य माणसाच्या सद्सद्विवेक बुद्धी वर , प्रामाणिक पणावर ,राष्ट्र निष्ठेवर जिवंत आणि प्रगतिशील आहे.  70 वर्षातील देशाची प्रगती सामान्य माणसाच्या असामान्य गुणांमुळे , त्यागा मुळे झाली आहे. त्यात मोदीजींच्या चौकीदार मोहिमेचा दूरदूर मात्र काही संबंध नाही. निरव मोदी, विजय माल्या, ललित मोदी  आणि इतर असेच उद्योगपती नको ते उद्योग करून देशाबाहेर पळाले तेंव्हा "चौकीदार झोपला" होता. , हे सामान्य जनतेने "उघड्या डोळ्यांनी" पाहिले आहे.
मोडीजींनी गुजरात चे मुख्यमंत्री असताना काँग्रेस च्या ज्या योजनांना शिव्यांची लाखोली वाहिली, ज्या योजनांच्या नावाने बोटे मोडली त्याच योजना काहींची नावे बदलून आज त्यांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या आहेत. योजना ह्या अभ्यासकरून बनविल्या जातात. गटारातून गॅस काढून त्यावर पकोडे तळणे इतक्या स्वस्त पणे योजना बनत नसतात.

राम माधव म्हणतात जनधन, आधार , मोबाईल ने चित्र पालटले. ह्या तिन्ही पैकी कोणतीही वस्तू मोदींजींनी आणलेली नाही. राजीव गांधींनी संगणक आणला तेंव्हा त्यांच्या नावाने शंख फुकणारे आज डिजिटल इंडियाच्या गप्पा ठोकतात तेंव्हाही नियती हसत असते. 

मोदी सत्तेवर येण्याआधी ह्या देशात जणूकाही शौचालयेच नव्हती असे भासवायचा भाजपचा प्रयत्न असतो.
चंपारण्य सत्याग्रहाच्या शताब्दी वर्ष कार्यक्रमात मोदीजी म्हणाले होते,  गेल्या आठवड्यात बिहारमध्ये साडेआठ लाख (8.5) शौचालये बांधली.
त्याचा जर हिशेब करायचा म्हंटले तर 1 मिनिटाला 84.31 शौचालये बांधली गेली पाहिजे. हे शक्य होते काय ? जसे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 1 लाख 20 हजार विहिरी बांधल्याचे सांगतात त्यातीलच हा प्रकार आहे.
उत्तम संवाद कोशल्य मोदींकडे आहे ही बाब कोणीही नाकारू शकत नाही.
परंतु " उत्तम संभाषण " आणि " सत्य संभाषण " ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. सत्य संभाषण हा गुण मोदींजीं कडे दुर्मिळ असावा.

"सबका साथ, सबका विकास" ह्या घोषणेचे जन्मदाते आपणच आहोत हे मोदीजी विसरलेले आहेत.
त्यामुळे ते आता पुलवामा, बालकोट आणि शहिद जवानांच्या नावावर मत मागत फिरत आहेत.  84 पेक्षा जास्त देशांचा दौरा - त्यावर खर्च करणे ,स्वतःच्या जाहिरातींवर जनतेच्या कष्टाच्या पैशाची धूळधाण करून खर्च करणे
ह्या मुळे जनतेला शून्य फायदा झालेला आहे. निरनिराळे साहित्यिक बोजड शब्द वापरून मोदींची प्रतिमा उंचावण्याचे राम माधव ह्यांचे प्रयत्न थीटे पडताना दिसतात. आडात असेल तर पोहऱ्यात येईल ही म्हण काहीतरी अभ्यासा अंतीच बनली असावी .

हुकूमशाह ज्युलियस सीझर चा अंत खूप करूण अवस्थेत झाला.
ज्युलियस सीझर ही एक शोकांतिका आहे. 
भारताच्या पंतप्रधान व्यक्ती साठी आपल्याला ज्युलियस सीझर ची काहीच गरज नाही.  आपण सर्वांना मान देतो व विविधतेचा पुरस्कार करतो. आपला इतिहास जास्त समृद्ध आहे. कृपया मोदींचे कौतुक करताना त्याचा अभ्यास करा.  


धनंजय जुन्नरकर

सचिव, प्रवक्ता मुंबई प्रदेश काँग्रेस.
💐🙏🙏🙏🙏

"मोदीजी" , आप "काम करो" तो जाने !


लोकसत्ता मध्ये 9 एप्रिल 2019 "पहिली बाजू " ह्या सदरा खाली "तुम मुझे मेरे काम से ही जानो " ह्या शिर्षकाखाली भाजपा उपाध्यक्ष व राज्यसभा सदस्य श्री.विनय सहस्त्रबुद्धे ह्यांचा लेख प्रसिद्ध झालेला आहे .त्या लेखाला प्रतिउत्तर देणारा काँग्रेस चा लेख .
*************************************

"मोदीजी" , आप "काम करो"  तो जाने !

**************************************

भाजपा उपाध्यक्ष व राज्यसभा सदस्य श्री.विनय सहस्त्रबुद्धे ह्यांनी मोदींच्या कामगिरी चे वस्तुनिष्ठ मूल्यमापन होत नाही व इतके औदार्य ही सध्या नाही अशी तक्रार करणारा आणि "मोदी चालीसा" पध्दतीची स्तुती करणारा  लेख लिहिला आहे.

2014 च्या काळात जागतिक पटलावर सत्ता संघर्ष होता व लोकशाही टिकविण्यासाठी जग धडपडत होते अशी माहिती सहस्त्रबुद्धे लिहितात.
2014 साली मोदींनी सत्तेवर येऊन लोकशाही टिकविली असे आडून आडून सुचवितात .  1947 साली भारत आणि पाकिस्तान ह्यांचा जन्म एकाच वेळी झाला आज पाकिस्तानातली नसलेली लोकशाही बघा. मग नेहरूंनी आणि काँग्रेस ने काहीच केले नाही असे बोलायला मोकळे व्हा.

मोदी आणि लोकशाही हे परस्पर विरुद्ध अर्थी शब्द आहेत.
नोट बंदी चा रात्रीतून घेतलेला निर्णय, जीएसटी चा निर्णय , मध्यरात्री सीबीआय संचालक कार्यालयावर धाडी, त्यांची रात्री बदली ही सगळी
 "आदर्श लोकशाहीची" उदाहरणे समजावी काय ?
जनतेच्या विश्वासाला नख लावण्याचे काम मोदी सरकार ने वारंवार केले आहे. त्या मुळे मोदी आणि लोकशाही हे शब्द एकत्र उच्चारले तरी चुकल्या चुकल्या सारखे वाटते.

2012-2014 च्या काळात काँग्रेस सरकार बद्दल भ्रमनिरास झाल्याचे ते लिहितात. अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल बाबा रामदेव ह्यांच्या सक्रिय
 "अ - राजकीय " चळवळी आणि कथित (न)झालेल्या घोटाळ्यांविषयी सहत्रबुद्धे प्रतिपादन करतात. दहशतवादी हल्ले , घटना झाल्याचे सांगून 
निरोगी लोकशाही साठी मोदी उदय झाल्याचे ते ठासून सांगतात. ह्या सर्व बाबींचे अवलोकन केले असता भाजपा आणि आरएसएस  विचारधारे च्या ह्या लोकांनी जनतेला कसे फसविले होते ते उमजले आहे. दिल्लीच्या जंतरमंतर वर मोदी सरकार येण्या आधीची अण्णा हजारे ह्यांच्या उपोषणाला होणारी गर्दी आणि साडेचार वर्षात लोकपाल न आल्यावर पुन्हा केलेल्या आंदोलना नंतर तेथे
 "न झालेली गर्दी " ह्यावरून हजारे ह्यांचे आंदोलन कोण चालवत होते ते जनतेला समजले. 
इंदिरा गांधी ह्यांचे सरकार उलथवून टाकण्यासाठी जयप्रकाश नारायण ह्यांच्या सभेला ही प्रचंड गर्दी आरएसएस च्या विचारांचे लोक करत होते. नंतर कार्यभाग उरकल्यावर त्यांच्या सभा ओस पडू लागल्या होत्या.हा इतिहास लोकांच्या लक्षात आहे. 
ह्या "अ-राजकीय" की अराजकीय  आंदोलनाचे लाभार्थी  अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री झाले. रामदेव बाबा ह्यांची 2012 पूर्वी ची जमीन, संपत्ती आणि 2019 मधील मालमत्ता ह्यांचा हिशोब केल्यावर ही आंदोलने का केली गेली हे लपून राहत नाही. ह्यांच्या आंदोलनांना काही पेड प्रसिद्धी माध्यमांनी किती वेळ दिला व सुपारी घेऊन बातम्या कशा केल्या ? ह्या बाबी पोषक लोकशाहीचे लक्षण आहे काय ? 

"ठाम विचार , निर्धारपूर्वक पाऊले टाकण्याची अजोड क्षमता " वगैरे मोठे मोठे शब्द लिहून  " मोदींना युगपुरुष"  दाखविण्याचा सहस्त्रबुद्धे केविलवाणा प्रयत्न करतात. 
मोदींची ठाम पाऊले गेल्या 5 वर्षात एक पत्रकार परिषद घेण्यासाठी ही कधी उचलली गेल्याचे 130 करोड जनतेने पाहिले नाही. त्यांची पाऊले त्यांच्या उद्योगपती मित्रांना घेऊन त्यांना परदेशी करार करण्यासाठी वारंवार एअरपोर्ट कडे जाताना पाहिली गेली. त्यांची पाऊले सतत निरनिराळ्या राज्यांच्या प्रचार रॅली साठी वारंवार मैदानांकडे वळलेली पाहिली गेली.
"भव्य दिव्य - थिंकिंग बिग " हे मोदींचे शब्द आणि योजना ह्यांचा शून्य उपयोग झाला आहे. काँग्रेस च्या योजनांना आकर्षक नावे देण्या बद्दल मात्र मी भाजपचे अभिनंदन करतो. काँग्रेस ने कामे करण्यावर लक्ष दिले , जाहिराती करण्याचे काम काँग्रेस ला करता आले नाही. कारण "बाते कम काम जादा" हा काँग्रेस चा नारा आहे.

ज्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची राळ उडवून भाजपा 2014 ला सत्तेवर आले त्यात किती लोक जेल मध्ये गेले ?  माजी पंतप्रधान मनमोहन सिंग ह्यांना शेलकी विशेषणे लावून वारंवार अपमान केला गेला. मौनी बाबा, रिमोट कंट्रोल ने चालणारा , "बाथरूम मे रेनकोट पहनकर नहाने वाला" म्हंटलं गेलं. 
 मनमोहन सिंग म्हणाले होते , "अभी की मीडिया की तुलना मे इतिहास मुझसे दयालु रहेगा" . त्यांचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन भाजपने केले काय ? 

एका रात्रीत मनमानी करून नोट बंदी केली गेली तेंव्हा ते म्हणाले की 2 टक्के जीडीपी घसरेल व तसेच घडले. अर्थशास्त्री विद्वान लोकांचे अपमान करून भाजपने काय "बिग थिंक " केले कुणास ठाऊक !

मोदी हे कठोर शासकाची प्रतिमा असलेले नेते असल्याचे सहस्त्रबुद्धे लिहितात. परंतु वास्तव वेगळेच जाणवते.
मोदी हे स्वतःच्या च प्रतिमेच्या प्रेमात पडलेली व्यक्ती आहे. त्यांना लोकांनी प्रश्न विचारले ले आवडत नाही, प्रश्नांपासून पळणारा ,समस्यांपासून पळणारा, राष्ट्रभक्तीच्या आड लपून सैनिकांच्या नावाने मतदान मागणारा केविलवाणी अशी व्यक्ती ते वाटतात.

आज भाजपच्या जुमलेबाजी करणाऱ्या संकल्प वजा जाहिरनाम्याचे प्रकाशन झाले. आता मोदी गुजरात मॉडेल च्या गप्पा मारत नाहीत. 2 कोटी रोजगार निर्मिती बद्दल बोलत नाहीत,काळ्या धना बद्दल बोलत नाहीत. 2034 वगैरे पर्यंत इतके इतके लाख कोटी रुपये वगैरे चे मोठे मोठे शब्द फेकतात. जनतेने 5 वर्षा साठी सत्ता दिलेली असते. पुढच्या 50-60 वर्षांच्या गप्पा मारून भ्रामक आकडेवारी ने किती वेळ फसविणार ??
लेखाच्या अंती मोदींची कविता सहत्रबुद्धे लिहितात. 

" तुम मुझे मेरी तसबीर या पोष्टर में ढूंढ़ने की 

व्यर्थ कोशीश मत करो ।

मैं तो पद्मासन की मुद्रा में बैठा हूँ।

आपण अटल बिहारी वाजपेयी प्रमाणे अजातशत्रू वगैरे आहोत असे त्यांना वाटत असावे.  स्वतःच्या कविते च्या ओळींशी स्वतः मोदी आणि त्यांचे कथित सहकारी  कशी प्रतारणा करत आहेत हे सगळा देश पाहत आहे.

 मोदी मोदी ही अक्षरे लिहिलेला सूट बनवून घालणे, "नमो टीव्ही" , बॅनर , पेट्रोल पंपावर होर्डिंग्ज, सर्व वृत्तपत्रांमध्ये पान भर फोटो असलेल्या जाहिराती , पेन ,लॉकेट,  साड्या सर्वत्र फोटो लावून झालेले आहे.  भारतीय सेनेला "मोदी सेना" म्हणून झाले आहे.  आता फक्त आकाशातील ढगांवर आणि नदी समुद्रातील वाहत्या पाण्यावर मोदींचे फोटो बाकी आहेत. 
त्यामुळे त्यांच्या सर्व आश्वासना प्रमाणे त्यांची कविताही जुमला ठरावी ,ह्या बद्दल खेद आणि वैषम्य वाटते.
सॉरी सहस्त्रबुद्धे जी तुमची मेहनत वाया गेली .
 बेष्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट टाईम !

धनंजय जुन्नरकर
सचिव, प्रवक्ता मुंबई प्रदेश काँग्रेस 

"मै भी चौकीदार "? एक फुकाची वळवळ !


शुक्रवार दिनांक 22 मार्च 2019 रोजी संपादकीय पृष्ठावर , "मै भी चौकीदार " चळवळ ह्या शिर्षकाखाली भाजपा  माध्यम विभागाचे राष्ट्रीय प्रमुख आणि प्रवक्ते अनिल बलुनी ह्यांनी जो लेख लिहिला आहे त्याला प्रतिउत्तर देणारा लेख !

"मै भी चौकीदार "? एक फुकाची वळवळ !

महात्मा गांधी ज्यांच्या "प्रातः स्मरणीय"  लिष्ट मध्ये कधीच नव्हते आणि आयुष्यभर ज्यांनी गांधींचा दुःस्वास  केला, त्या मातृ-पितृ विचार धारेतून आलेल्या भाजपच्या नेत्या प्रवक्त्याना तोंड देखलेपणाने का होईना गांधीजींची उदाहरणे द्यायची पाळी आली ही त्यांच्या साठी शोकांतिकाच आहे.
"मै भी चौकीदार" ह्या लेखात ते बेमालूम पणे महात्मा गांधी ह्यांचे आंदोलन आणि आदरणीय विनोबा भावे ह्यांची 1952 सालची "भूदान चळवळ "ह्यांच्याशी तुलना करून प्रधान सेवक मोदी ह्यांना त्या पात्रते ला नेण्याचा प्रयत्न करतात. पण गांधी आणि भावे ह्यांच्याशी तुलना करायला भाजपात अजून कुणी जन्मलेले नाही, पुढे जन्मायची शक्यता ही दिसत नाही.
मुळात "मै भी चौकीदार" ही चळवळ म्हणायच्या पात्रतेची तरी  वळवळ आहे काय??

मुदलात 2014 ला चाय वाला, गुजरात मॉडेल, अच्छे दिन , मेक इन इंडिया ,स्टार्टअप इंडिया च्या घोषणा कुठे कधी हरविल्या आणि "चौकीदार चोर है " ही घोषणा लोकांनी कशी उचलली ,हे भाजपच्या चाणक्यानां ही कळले नाही.

देश, राष्ट्रवाद , भारतमाता की जय, वंदे मातरम ,ह्या सर्व बाबी, मतपेटीतून विजयाचा मार्ग शोधण्यासाठीच्या युक्त्या होत्या ,हे जनतेला लोकसभेच्या शेवटी शेवटी समजायला लागले आहे. भाजपचे प्रवक्ते अनिल बलुनी ह्यांच्या मते मोदींच्या  "मै भी चौकीदार"
ह्या ट्विट ने क्रांती केली आणि सामाजीक चळवळ उभारली गेली. ज्या पक्षाचे कोटीच्याकोटी सदस्य 
मिस कॉल ने तयार होतात, ज्यांच्याकडे समाजमाध्यमाच्या निरनिराळ्या विभागासाठी  खर्च करायला पैसे आणि टीम आहे त्यांना हे सर्व सहज शक्य आहे.
भाजपच्या एका प्रवक्त्याच्या मते मोदीजी विष्णूचा अवतार देखील आहेत. त्या अर्थाने मोदींजींचा जन्म स्वातंत्रपूर्व झाला असता तर 150 वर्षे लढण्याची गरज देखील नसती. त्यांच्या एका ट्विट ने देखील चळवळ उभी राहिली असती आणि ब्रिटिश सरकार मागे वळून न बघता पळत सुटले असते.

"सबका साथ सबका विकास " ही घोषणा तर सर्वात जास्त ट्रोल झालेली आणि हल्ली तर विनोदांसाठी वापरली जाणारी घोषणा आहे.

भ्रष्टाचार आणि भाजपा हे समानार्थी शब्द आहेत, परंतु काही पेड माध्यमांमुळे लोक विस्मृतीत गेले होते.,ते आता खाडकन जागे झाले आहेत . 
अनिल बलुनी ह्यांचे एक वाक्यातील 3 शब्द आवडले ते म्हणजे " लाल किल्ल्याच्या सदरेवरून ". आपण खूप काही ऐतिहासिक लिहत असल्याचे भाजपच्या बोरू बहाद्दरांना वाटत असते पण ते तसे नाही. "सदर लाल किल्ला ही भाड्याने देऊन नको तिकडे व्यापार दाखवायचा मूर्खपणा मोदी सरकार ने केलेला आहे. एकाच मित्राला 5 एअर पोर्ट भाड्याने दिले तेंव्हा अनुभव पाहिला गेला नाही.

"2014 सबका साथ सबका विकास " ह्या घोषणेचे  "मेरा झूठ सबसे मजबूत" ह्या घोषणेत लोकांनी कधी रूपांतर केले ते भाजपच्या धुरीणींना कळले ही नाही.
रोजगाराचे आकडे जाहीर करायला 56 इंच छाती घाबरते हे जनता बघत आहे. 12,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या ,रोज शाहिद होणारे जवान , पाकिस्तानला जाऊन केक खाणे,पुलवामच्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले त्याला महिना झाला नाही तर त्यांच्या पंतप्रधानाला चोरून एसएमएस पाठविणे , ह्या गोष्टींची नोंद जनता घेत नाही असे वाटते काय? 

वर्षाला 2 कोटी नवीन रोजगार राहिले बाजूला , काँग्रेस काळात लागलेल्या 1 कोटीच्या वर नोकऱ्या गेल्या. शेतमजूर घरी बसले. मजुरी द्यायला पैसे नाही. एम टी एन एल च्या कामगारांना ,जेट च्या कामगारांना , छत्तीसगड च्या चौकीदारांना 4 ते 6 महिने पगार मिळत नाहीए. जगात सर्वात मोठा पुतळा सरदार पटेल ह्यांचा बनविण्यासाठी प्रचंड खर्च केला त्या कामगारांना पगार द्यायला पैसे नाहीत. 70 वर्षात अशी भीषण परिस्थिती आली नव्हती.
जनतेचा 1 रुपयाही संसदेच्या मंजुरी शिवाय खर्च करता येणार नाही, हे लोकशाहीचे तत्व आहे. ह्या तत्वालाही केराची टोपली दाखविण्यात आलेली आहे.
संसदेच्या मंजुरीशिवाय 99,610 कोटी रुपये खर्च केले गेले आहेत.कॅग ने यावर ताशेरे मारले आहेत. गोदी मीडियात ह्याची बातमी देखील नाही.अर्थमंत्रालायचे ह्या बाबींकडे दुर्लक्ष आहे.हे जाणीवपूर्वक आहे. जिकडे चौकीदारी करायला पाहिजे तिथे सर्व कथित चौकीदार डोळ्यावर झापडे लावून मूग गिळून बसलेले आहेत.

न्यायाधीश पत्रकार परिषद घेत आहेत. पत्रकारांचे खून होत आहेत. न्यायाधीश संशयास्पद रित्या मृत्यु मुखी पडले आहेत, केस घ्यायला तयार नाहीत,  खऱ्या बातम्या दिल्या तर ते चॅनल केबल वरून गायब करण्यात येत आहे. संपादकांना घरी बसविले जात आहे. असा भारत कुणी अपेक्षिलेला नाही.

आंनदी देशाच्या क्रमवारीत सतत 3 वर्षे आपला क्रमांक घसरत गेलेला असून 156 देशांच्या क्रमवारीत तो 140 वर गेलेला आहे. आपण 16 जणांच्या पुढे आहोत ह्यात तर मोदींजींना आनंद होत असेल तर आपण काय बोलणार.?
पाकिस्तान चा 67 तर बांगलादेश चा 125 वा क्रमांक आहे. आपण त्यांच्याही मागे आहोत.

नोट बंदीतही हेच केले.4 नोव्हेंबर 2016 पर्यंत 17.97 लाख कोटी रोख रुपये चलनात होते. डिजिटल इंडियाची खोटी जाहिरातबाजी करून लोकांना पुन्हा फसविले. ह्या चलनात आता 19.44 % वाढ झालेली असून 21.41 लाख कोटी रुपये रोख चलन बाजारात उपलब्ध आहे. हजारो नोकऱ्या गेल्या , कारखाने बंद पडले, लायनीत उभे राहून 100 च्या वर मृत्यू मुखी पडले पण चौकीदाराला त्याचे सोयरसुतक नव्हते.
राफेल विमान घोटाळा हा इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा म्हणून नोंद केला जाईल अशी चिन्हे आहेत. चौकीदार प्रामाणिक आहे तर संयुक्त संसद समिती का नेमली जात नाही? 

माजी सीबीआय निर्देशक आलोक वर्मा राफेल ची फाईल उघडतील ह्या भीतीने रातोरात त्यांची बदली करणे, न्यायालयाला शपथेवर खोटे सांगणे  देशाच्या महत्वाच्या संस्थांना बटीक बनवून टाकणे हे काही लपवून ठेवण्या सारखे नाही.

हाय प्रोफाइल 2 जी घोटाळ्याचे खोटेपण लोकांना समजले आहे. तत्कालीन ए. राजा समवेत 17 आरोपींना न्यायालयाने निर्दोष सोडलेले आहे.
भाजपा आणि मोदी सरकार ही एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी झालेली आहे.
सतत नवीन घोषणा देणे , कुणी सरकार ला प्रश्न विचारले तर राष्ट्रवादी घोषणा देणे, त्याला देशद्रोही म्हणणे हेच गेले 4 साडेचार वर्षे लोक बघत आलेले आहेत.
हे आता जास्त दिवस चालणार नाही.
 मतदारांमध्येही एक गावरान शहाणपणा असतो, तेथे वारंवार चाणक्य नीती चालत नाही. 
"बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर" ही घोषणा मोदी सरकार ला माहीत नसावी . लोकांना माहीत आहे.
मोदीजी अखलाक च्या मृत्यु वर ,नजीब च्या गायब होण्यावर , दलितांना झाडाला टांगून मरेस्तोवर मारण्यावर ,झुंडशाही ने विशिष्ट समाजाच्या लोकांच्या हत्या होण्यावर काहीच ट्विट करत नाहीत.
 त्यावर ट्विट करून काही चळवळ उभारल्याचे आम्ही कुठेही पाहिले नाही.
गांधीजींच्या 71 व्या स्मृतिदिनी त्यांच्या पुतळ्यावर बंदुकेने गोळ्या झाडणाऱ्या साध्वी चे दर्शन जगाने घेतले. त्यावेळी "मै मोहनदास गांधी " असे ट्विट करणे आणि चळवळ उभी करणे ह्याची इच्छा प्रधान सेवकांना झाली नाही. तेही देशाने पाहिले आहे. 
आज जर गांधींचा खून गोडसेने केला असता तर तो पुराव्याअभावी नक्की सुटला असता आणि लोकसभा लढविण्यार्यांच्या यादीत त्याचे नावही दिसले असते.
असो.
कितीही प्रयत्न केला तरी, "चौकीदार चोर आहे " ही घोषणा विस्मृतीत जाणार नाही आणि त्यापासून भाजपाला पळताही येणार नाही हेच सत्य आहे.

- धनंजय जुन्नरकर
सचिव, प्रवक्ता -टिव्ही पॅनलिस्ट
मुंबई प्रदेश काँग्रेस 
9930075444

Show quoted text

Thursday, 28 March 2019

Journalist-View: सार्वजनिक गणेशोत्सव ,उच्च न्यायालयाचा आदेश आणि राज...

Journalist-View: सार्वजनिक गणेशोत्सव ,उच्च न्यायालयाचा आदेश आणि राज...: सार्वजनिक गणेशोत्सव ,उच्च न्यायालयाचा आदेश आणि राज्य शासनाचा धोरण लकवा                                                                  ...

Journalist-View: सार्वजनिक गणेशोत्सव ,उच्च न्यायालयाचा आदेश आणि राज...

Journalist-View: सार्वजनिक गणेशोत्सव ,उच्च न्यायालयाचा आदेश आणि राज...: सार्वजनिक गणेशोत्सव ,उच्च न्यायालयाचा आदेश आणि राज्य शासनाचा धोरण लकवा                                                                  ...

Tuesday, 23 February 2016

इलेक्ट्रॉनिक मिडिया आणि त्यांचा घसरता दर्जा !



इलेक्ट्रॉनिक मिडिया आणि त्यांचा घसरता दर्जा !
                                                                                                   धनंजय जुन्नरकर 
                                                                                         सचिव , मुंबई काँग्रेस 

चौकट 
राष्ट्रीय प्रसारमाध्यमांच्या बातम्या ,चर्चा ,त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न ,त्यातून मिळणारे सकस वैचारिक  खाद्य ,एन्कर व त्यांचे वर्तन ह्या विषयी खोलात ,तपशीलात जाऊन विचार करायची गरज आहे . आत्ता पर्यंतचा अनुभव फार चांगला नाही .  राष्ट्रीय व राज्यीय वाहिन्यांच्या प्राईम टाईम मध्ये होणाऱ्या चर्चेत ,"मुद्द्याची लिंक लागायला लागली की ते ब्रेक घेतात " , की " लिंक लागूच नये म्हणून ब्रेक घेतात " हे न उलगडणारे कोडे आहे . ह्या वाहिन्यांच्या सुधारणेला खूप वाव आहे . पण , त्यांना सुधारण्याची इच्छा आहे का ? हा देखील महत्वाचा प्रश्न आहे . काही वाहिन्यांनी लोकशाहीच्या "चौथ्या खांबाची 'अवस्था मंडपवाल्याच्या बांबू सारखी केली आहे . तुम्ही फक्त पैशांचे काय ,तेवढ बोला , बाकी मंडप तयार आहे .!





"पत्र व्यवसाय हा जरी धंदा असला, तरी पत्रकारांची वृत्ती हा मात्र एक महान धर्म आहे . धंद्याला स्वरूप द्यावे ,पण धर्माचा मात्र धंदा करू नये . जनताजीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात क्रांती व्हावी म्हणून ,पत्रकारांच्या लेखणी -लेखणी मधून क्रांतीरसाच्या चिळकांड्या उडाव्यात आणि वृत्तपत्रे ही क्रांतीरसाची कारंजी व्हावीत . जनता क्रांतीचा जयजयकार करणे हाच खरा पत्रकाराचा धर्म आहे". पत्रकारितेवर आचार्य अत्रे यांचे हे मत होते . 
गेल्या काही दिवसातल्या बातम्या आणि काही इलेक्ट्रोनिक माध्यमांच्या एन्करांची (anchor) भाषा पाहिल्यावर अत्रे नक्कीच म्हणाले असते की गेल्या १०,००० वर्षात असे मूर्ख एन्कर पाहिलेले नाहीत . पत्रकार हा बातमी मागची बातमी शोधणारा बुद्धिमान व्यक्ती असतो किंबहुना असला पाहिजे . खोट्या पुड्या सोडून बातम्या तयार करणारा व्यक्ती पत्रकार असू शकत नाही . 

भारतात ७०,००० पेक्षाही अधिक वर्तमान पत्रे ,६९० वाहिन्या आहेत . त्यात ८० वाहिन्या बातम्यांवर आधारित आहेत . भारतात रोज १० कोटी वर्तमान पत्रे विकली जातात.  ह्या मुळे पत्रकारांची जबादारी जास्त वाढते . गेल्या काही महिन्यातील महत्वाच्या विषयांवरच्या बातम्या पहिल्या ,उदा - दादरी कांड ,रोहित वेमुला ,सलमान खानचे  हिट अन्ड रन ,संजय दत्त चे पेरॉल वर बाहेर येणे आणि आत्ताचे जे.एन.यु. प्रकरण ,तर झालेले वार्तांकन आपली वैचारिक भूक भागवत नाही . बातम्या व त्यावर जाणिव पूर्वक घडवून आणलेल्या चर्चा सामान्य लोकांची गरज वाटण्या पेक्षा वाहिन्यांचा किंवा त्या विषयाने ज्यांचा फायदा होईल अशांचा वैयक्तिक अजेंडा वाटतो .  

पत्रकार हा सरकारच्या विरोधातला, निवडून न आलेला जनतेचा प्रतिनिधी असतो ,असे मला वाटते
काही मोठया वाहिन्यांच्या पत्रकारांनी ,त्यांच्या एन्कारांनी आपले सत्व आणि स्वत्व हरवले आहेत असे वाटते . ,किंवा त्या वाहिन्यांच्या मालकांचे हितसंबंध  जपण्याच्या नादात आपण मुळचे पत्रकार आहोत याचा त्यांना विसर पडलेला आहे . त्यांच्या बातम्या आणि चर्चा ह्या बातम्या न वाटता ,गल्ली बोळातल्या सार्वजनिक उत्सवातील मनोरंजना साठी बोलाविलेल्या वाद्यावृंदा प्रमाणे वाटत आहेत . 
जे.एन.यु. प्रकरणात कन्हैय्या कुमारच्या तोंडातून नेघालेले " हमे चाहिये आझादी " हेच वाक्य प्रसारमाध्यमांनी  दाखविले . भुकमरी से ,पुंजीवाद से ,सामंथवाद से ,मनुवाद से ,गरिबी से ही वाक्ये दाखवीली गेली नाही . उलट दुसऱ्या व्हिडियो तील काश्मिरी मुलांनी एबिविपि च्या मुलांच्या घोषणांना चिडून,प्रतीउत्तर देताना दिलेल्या घोषणा जोडून दाखविल्या . ज्या मुलांचा जे.एन.यु. शी संबंध नाही ,त्यांचा संबंध जोडला ,तसेच :वन्दे मातरम बोला ,भारत माता की जय बोला . नाहीतर तुम्ही देश द्रोही अशी ही दमबाजी केली गेली . भारत माता की जय बोललो आणि भारताचा झेंडा हातात घेतला तर कुणालाही देश द्रोही ठरवायचे व मारायचे लायसन्स आपल्याला मिळते  काय ? या वर किती पत्रकारांनी प्रश्न विचारले ,ते समजले नाही . पत्रकार आणि त्यांचे मालक गुप्तपणे आपले व्यावसायिक हीत जपण्यासाठी विशिष्ट विचारसरणी राबवण्यासाठी काम करू लागले ,तर अराजकतेला फुकटचे निमंत्रण आहे . प्रसारमाध्यमांना आपण लोकशाहीचा चौथा खांब म्हणतो ,परंतु काही भ्रष्ट लोकांनी ह्या खांबाला पैशाची थैली लटकावली तर हा खांब पैशाच्या दिशेला झुकू लागतो ,हे दृश्य  देशाचे दुर्दैव आहे . 

आरुषी हत्याकांड ,शिनाबोरा हत्याकांड ,२६/११ चा अतिरेकी हल्ला ,अभिनेते ,उद्योगपतींची बिघडलेली मुले ह्यांची हिट अन्ड रन प्रकरणे ,तसेच रोहित वेमुला ,कन्हैय्या कुमार ह्या बाबतीतील वार्तांकन प्रामाणिक तेच्या कसोटीला धरून नव्हते .  आपण बातम्या पाहत आहोत की  सीआयडी ,क्राईम पेट्रोल ,सावधान इंडिया कार्यक्रम पाहात आहोत काही कळत नाही . 
राजाराम मोहन राय ,दादाभाई नौरोजी ,लोकमान्य टिळक ,गोपाल कृष्ण गोखले ,अशा नेत्यांनी साप्ताहिके ,वृत्तपत्र काढली ,जनतेच्या हक्कांसाठी लिहिले . जनतेला नवीन दृष्टी दिली ,त्यांच्यात एकता निर्माण केली . अन्यायाला वाचा फोडण्याचे काम प्रसारमाध्यमांनी केले . १९९४ मध्ये युनिसेफ ने युध्द आणि नैसर्गिक विपदेत पिडीतांना मदत करण्यासाठी प्रसार मध्यामांचीच मदत घेतली होती . अमेरिकन लष्कराने इराक युद्धाच्या वेळी केलेल्या अत्याचाराला माध्यमांनीच वाचा फोडली होती . जेसिका लाल ,नितीश कटारा यांचे  खटले  माध्यमांच्या दबावापायी उघडले  गेले  .

आत्ता काही वाहिन्यांनी देशभक्तीच्या नावाने धुमाकूळ घातला आहे . परंतु त्यांनी केलेल्या चुका व अप्रामाणिक पणामुळे त्यांच्या वर पुन्हा विश्वास ठेवायची हिम्मत होत नाही . २४ तास काय दाखवायचे ह्यामुळे व टिआरपी च्या रेट्या पायी अतिरंजित पणा व उत्सवीपणा ,नाटकीपणा  वाढत चालला आहे . चर्चेसाठी समोर बसलेले प्रवक्ते ,तज्ञ ,पाहुणे ह्यांचातला आणि एन्कर मधला संवाद हा नळावरच्या भांडणासारखा वाटतो . चर्चा करताना एन्कर ने असे प्रश्न मांडावेत जेणेकरून  आपोआप अशी उत्तरे मिळतील की लोकांना आपले मत तयार करता येईल . 

काही एन्कर स्वतःला न्यायमूर्ती समजतात व आपल्या समोर बसलेले प्रवक्ते हे बलात्कारी ,खंडणीखोर ,पाकीटमार असावेत अशा रितीने  प्रवक्त्यांच्यावर ओरडतात . 
हिंदू शास्त्राच्या संकेतानुसार माणसाच्या पाप पुण्याचा हिशेब चित्रगुप्ताच्या वहीत लिहिलेला असतो . त्याच्यावर त्याचे स्वर्ग किंवा नरकात जाणे ठरते . हिंदी मराठीतल्या काही वाहिन्या ,तशा प्रकारे प्रवक्त्यांवर ओरडत असतात व "बघा पडद्यावर " लोक तुमच्या साठी काय म्हणतात,असे म्हणून त्यांची  उलट तपासणी घेत असतात  . 

राष्ट्रीय वाहिन्या म्हणून ज्या वाहिन्या आहेत त्यांना राष्ट्रीय वाहिन्या का म्हणावे ,हे समजत नाही . मोठ्या  उद्योगपतींचे पाठबळ आहे ,देशभर पत्रकार नेमता येतात . त्यांना पगार देता येतो.  म्हणून त्या वाहिन्या राष्ट्रीय आहेत .? की , राष्ट्रीय प्रगतीसाठी ,राष्ट्राच्या एकतेसाठी , जनताभिमुख पत्रकारिता करतात ,म्हणून  त्यांना राष्ट्रीय म्हणावयाचे हा यक्ष प्रश्न आहे .चार तासाच्या पावसाने शहर तुंबले तर २४ तास बातम्या देणारे पत्रकार मात्र ,एक महिला १० किलोमीटरहून पाणी आणते हि बातमी २० सेकंद ही दाखवत नाही . २६/११  च्या हल्ल्यात हॉटेल ताज वरचे वृत्तांकन ६० तास चालले ,परंतु सीएसटी स्टेशन वरच्या हल्ल्याच्या बातम्या किती वेळ दाखविल्या गेल्या ? ताज मध्ये पैसेवाल्यांच्या जिवन मरणाचा प्रश्न होता ,सीएसटी स्टेशन वर मरणारे तर ,तुमच्या आमच्या सारखे सामान्य होते . आपल्या जगण्या मरण्याला काय टिआरपी मिळणार ?

राष्ट्रीय प्रसारमाध्यमांच्या बातम्या ,चर्चा ,त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न ,त्यातून मिळणारे वैचारिक सकस खाद्य ,एन्कर व त्यांचे वर्तन ह्या विषयी खोलात ,तपशीलात विचार करायची गरज आहे . 
आत्ता पर्यंतचा अनुभव फार चांगला नाही . राष्ट्रीय व राज्यीय वाहिन्यांच्या प्राईम टाईम मध्ये होणाऱ्या चर्चेत ,"मुद्द्याची लिंक लागायला लागली की ते ब्रेक घेतात " , की " लिंक लागूच नये म्हणून ब्रेक घेतात " हे न उलगडणारे कोडे आहे . ह्या वाहिन्यांच्या सुधारणेला खूप वाव आहे . पण , त्यांना सुधारण्याची इच्छा आहे का ? हा देखील महत्वाचा प्रश्न आहे . काही वाहिन्यांनी लोकशाहीच्या चौथ्या खांबाची अवस्था मंडप वाल्याच्या बांबू सारखी केली आहे . तुम्ही फक्त पैशांचे काय ,तेवढ बोला , बाकी मंडप तयार आहे . 

धनंजय जुन्नरकर 
सचिव , मुंबई काँग्रेस 
सदस्य ,प्रसार माध्यम समिती ,मुंबई काँग्रेस 

Friday, 12 February 2016

महिलांचे देवदर्शन आणि बेगडी पुरोगामित्व धनंजय जुन्नरकर MAHILANCHE DEVDARSHAN AANI BEGADI PUROGAMITV


महिलांचे देवदर्शन आणि बेगडी पुरोगामित्व 
धनंजय जुन्नरकर 
सचिव , मुंबई काँग्रेस ,
पदवी ,मानवी हक्क ,यशवंतराव  चव्हाण विद्यापीठ ,नाशिक 
                                                                                                                                                                 djunnarkar74@gmail.com



चौकट 
शेवटी सर्वात महत्वाचे म्हणजे जिवंत माणूस हा जास्त महत्वाचा आहे . आपण गाईचे अधिकार मानतो पण बाईचे अधिकार मानत नाही . नुसते "सावित्रीच्या लेकी सावित्रीच्या लेकी "म्हटल्याने आपली सुटका नाही . माणूस म्हणजे संत साहित्यात सांगितल्या प्रमाणे हाड,मांस ,आणि रक्ताचा आकार बध्द चिखल आहे . शरीराच्या आत मलमुत्र घेऊन प्रत्येक व्यक्ती फिरत आहे . त्यात महिला आणि पुरुष यांत काहीही फरक नाही . कुणाला कबरीपाशी जाऊ दयायचे नाही, कुणाला चौथऱ्यावर जाऊ दिले जात नाही ,हे त्यांच्या मुलभूत अधिकारांवरचे आक्रमण मानले पाहिजे . जर देवाच्या आज्ञेच्या विरुध्द महिला दर्शन घेऊ इच्छित असतील ,तर त्यांना शिक्षा करायचा  देवाचा अधिकार आहे . देव आणि महिला यांच्यात तुम्ही-आम्ही आणि त्या ट्रस्ट ने तरी का पडायचे ?
***************************************************************************************************************************************************************************************************************


                                        हाजी अली आणि शनि शिंगणापूर ही  धार्मिक स्थाने सध्या वादाची आणि मुलभूत अधिकारांच्या कक्षा रुंदावण्याच्या चर्चेची केंद्र बनलेली आहेत . ही दोन्ही प्रकरणे वेगवेगळ्या धर्माची आहेत परंतु,महिलांना प्रतिबंध करण्याच्या बाबतीत समान आहेत .हाजी अली दर्ग्यात गेली कित्येक वर्ष दर्ग्यातील कबरीला हात लावून महिला प्रार्थना करू शकत होत्या . परंतु,२०१२ पासून दर्ग्याच्या विश्वस्त मंडळाने महिलांना गाभाऱ्यात प्रवेश बंदी केली आहे . शनि देवस्थानच्या विश्वस्त मंडळानेही महिलांना चौथऱ्यावर जायला बंदी केली आहे . दोन्ही धर्माच्या महिला याविरुध्द आंदोलन आणि कोर्ट कचेऱ्या करत आहेत . केरळच्या शबरिमल देवस्थानाचे प्रकरण असेच असून, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी निर्णय राखून ठेवला आहे . त्यामुळे कनिष्ठ न्यायालयांनी देखील आपला निर्णय दिलेला नाही . 
                                   धर्म आणि त्या संबंधी वाद हे, एक प्रकारचे" आग्या मोहोळ " असते, अशी जगातल्या सर्व राजकीय पक्षांची धारणा असते . जे राजकीय पक्ष फक्त धर्म केंद्रित राजकारण करतात ते ह्याला अपवाद आहेत . ते याच्यातून आपला फायदा तपासत असतात . राजकीय सुधारणा आधी की सामाजिक सुधारणा आधी यावर स्वातंत्र्यापूर्वी वाद झडत होते . धर्माचे अवडंबर न माजविणे आणि सामाजिक सुधारणांना गती देणे, हे सर्वांचे प्राथमिक कर्तव्य असले पाहिजे . लोकांच्या सारासार बुद्धीला तार्किक आणि वैज्ञानिक दृष्टीचे कोंदण चढविणे गरजेचे आहे . 
              " यत्र नार्यस्तु पुजयन्ते ,रमन्ते तत्र देवता - अर्थात नारीला जेथे  पूजनीय मानली जाते -तिचा सन्मान केला जातो, तेथे देव निवास करतात . मग जेथे देव निवास करतात तेथेच आपण नारीला जाऊ देणार नसू ,तर मग ही उक्ती खोटी आहे असे म्हणावे लागेल किंवा मग तसे वागावे तरी लागेल . 
  शनि शिंगणापूरच्या दर्शनाच्या महिला प्रवेश बंदीची परंपरा ४०० वर्षांची ,केरळच्या शबरिमल देवस्थानाची परंपरा ५०० वर्षांची ,हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश बंदी नाकारण्याची परंपरा २०१२ पासून आहे . अशा परंपरांचा अभिमान बाळगायचा की त्यात सुधारणा करायची हा महत्वाचा प्रश्न आहे . 
  वर्ण व्यवस्था ,वर्ग व्यवस्था यावर स्वातंत्र्यपूर्वी आणि त्या नंतरही चर्चा आंदोलने चालू आहेत . जाती भेद मानून स्वतःच्या अपत्यांना "ओनर किलिंग "च्या नावाने मारून टाकायचे ,  असे आदेश देणाऱ्या अनधिकृत जात पंचायती ,खाप पंचायती चालवायच्या, हे आपण अजूनही पाहत आहोत . 
  ताजमहल मधील मुमताजची कबर ,फतेहपुर सलीम चिश्ती  दर्गा ,नागपूर येथील ताजुद्दीन बाबा दर्गा व अजमेर शरीफ दर्ग्यात महिला" मझार "पर्यंत जाऊ शकतात . पण २०१२ च्या हाजी अली दर्ग्याच्या विश्वस्त मंडळाच्या फतव्या पासून महिला हाजी अली यांच्या दर्ग्यात मझारी पर्यंत जाऊ शकत नाहीत . हे भेद आपण का पाळायचे ?असे महिलांना वाटले असल्यास नवल नाही . जगातले सर्व धर्म गुरु महिलांच्या हक्कांच्या विरुध्द एक असतात हे वारंवार दिसलेले आहे . पद्मश्री ,पद्म भूषण किंवा तत्सम सन्मान मिळविणारे साहित्यीक अशा धार्मिक वादांवर सहसा लिहित नाहीत . कशाला उगाच वाकड्यात शिरा ?असा त्यांचा आविर्भाव असतो . काही विद्वान लोक स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचे स्थान आहे असे दर्शविणारे तर काही पंडित ,अगदी त्याच्या विरुध्द विचाराचे श्लोक पुरावा म्हणून दाखवतात . टि आर पी च्या नादी लागलेली दृश्य प्रसार माध्यमे १०० वेळा ब्रेक घेऊन प्रश्नाच्या चर्चेचा पार चोथा करून टाकतात .उथळ चर्चा करण्यापेक्षा खोलात जाऊन चर्चा करायची कोणाचीच इच्छा नाही . 
                                         हिंदू धर्मातील जुनाट पुराणवादी रूढी , परंपरा बदलण्यासाठी राजाराम मोहन रॉय ,महात्मा ज्योतिबा फुले ,सावित्रीबाई फुले यांनी संपूर्ण आयुष्य वेचले . डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी तर हिंदू धर्माचा त्याग केला . बरीच आंदोलने ,लढा , दिल्या नंतर अनेक सुधारणा झाल्या . १९२९ चा बाल विवाह विरोधी कायदा ,१९६१हुंडा प्रतिबंध कायदा ,१९६९ घटस्फोट कायदा ,१९८७ सती प्रथे विरुध्द कायदा ,१९९४ लिंग निदान प्रतिबंध कायदा आपण केला . देवदासी प्रथा ,विशेष विवाह ,असे कायदे वेद ,शास्त्र ,पुराणात लिहिले होते काय ?मंदिर ,मस्जीत मध्ये लाउड स्पीकर लावा ,असे भगवद गीतेत किंवा पवित्र कुरआन याच्यात लिहिले आहे काय ?समुद्र ओलांडायचा नाही असे, जवळ -जवळ पूर्वीच्या सगळ्यांनी सांगितले आहे . तर मग आता कोणत्या धर्मातील लोक समुद्र पार करत नाहीत ? 
                         पुरुषसत्ताक विचार आणि धर्म मार्तंडांनी महिलांना मतदानाचा अधिकारही नाकारला होता . निरनिराळ्या देशातील महिलांनी या साठी प्रचंड लढा दिला ,तेंव्हा हा अधिकार मिळाला . १८९३ ला न्यूझीलंड ने ,१९१८ मध्ये इंग्लंड ने १९२० मध्ये अमेरिकेने तर सौदी अरब च्या शाह अब्दुल्ला ह्यांनी २०११ला महिलांना मतदानाचा तर २०१५ ला निवडणूक लढविण्याचा अधिकार दिला . 
हिंदू संस्कृतीचे अवलोकन केले असता ब्रम्हा ,विष्णु , महेश हे सृष्टीचे रचेते आहेत .अत्री ऋषी यांच्या पत्नी अनुसूया माता ह्यांनी आपल्या तपोबलाने ह्या तिन्ही देवांचे  बाळांमध्ये  रुपांतर केले होते . सृष्टीच्या रचेत्यांचे महिला ,जर बाळ बनवू शकत असतील तर इतर देवांचे दर्शन घ्यायला स्त्रियांना कोण कशी काय बंदी घालू शकेल ? 
                                         भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत धर्म निरपेक्ष व लोकशाही गणराज्य हे शब्द आहेत . सर्वोच्च न्यायालयाने आपल्या अनेक निर्णयातून राज्य घटनेच्या सरनाम्याचे महत्व सांगितले आहे . ह्यात सामाजीक ,आर्थिक आणि राजनैतिक विचार अभिव्यक्ती ,विश्वास ,श्रद्धा व उपासना ह्याचे स्वातंत्र्य आहे . भारत सरकार व राज्य सरकारला जे अधिकार प्राप्त आहेत ते लोकांपासून मिळालेले अधिकार आहेत . त्यात महिलांचाही समान सहभाग आहे . भारतीय राज्य घटनेचे कलम १४ हे समानता तर कलम १५ नुसार धर्म,वंश ,जात ,लिंग ,जन्म स्थान ह्यावरून कोणतेही भेदभाव होणार नाही ,हे दर्शविलेले आहे .मानवी हक्कांचा जाहीरनामा कलम २ मध्ये ह्याच बाबी सांगितलेल्या आहे . भारतीय राज्य घटनेचे कलम २५ नुसार समानतेने सारासार विचार करायचे आणि पेशा आचारण्याचे -धर्म प्रसाराचे स्वातंत्र्य आहे . मानवी हक्कांचा जाहीरनामा कलम १४ आणि १८ नुसार देखील हेच सांगितले आहे . धर्माद्वारे भेद भाव करण्याचे  अधिकार कोणालाच नाहीत . " जेंव्हा एखाद्या ऐतिहासिक कारणांनी "संधी बाबत प्रचंड असमानता" निर्माण होते ,तेंव्हा अंतिम ध्येया पर्यंत समानता पोहोचविण्यासाठी " न्याय्य भेद " म्हणजेच पॉजीटिव्ह डिसक्रीमिनिशेन किंवा विश्वास दर्शक कृती केली जाऊ शकते . आंतर राष्ट्रीय कायद्याच्या हक्कांमध्ये " विशेष ऊपाय " केले जाऊ शकतात . "
                                         राजकीय पक्ष , धार्मिक गुरु ह्यांच्यापेक्षाही मानव म्हणून मिळालेले अधिकार सर्व श्रेष्ठ आहेत . त्यामुळे मानव म्हणून महिलांच्या अधिकारांचे महत्व जास्त आहे . हिंदू संस्कृतीत अहिल्या ,द्रौपदी ,सीता ,तारा ,मंदोदरी  ह्या पाच पतिव्रता होत्या . त्यांच्या स्मरणाने देखील पाप मुक्त होतो ,असे श्लोक दर्शवितात . शेवटी त्यांनाही पुरुष सत्ताक पद्धतीतच राहावे लागले असा इतिहास आहे . जेथे ह्या महान स्त्रियांना अग्नी परीक्षा चुकली नाही तेथे सामान्य महिलांना कसे काय अधिकार मिळणार ?
असे म्हणतात की , ५० वर्षानंतर भोजनात बदल करायला हवा ,
                         १००  वर्षानंतर घर पाडायला हवे ,
                        ५००  वर्षानंतर देऊळ पाडायला हवे ,
                        १०००  वर्षानंतर धर्माला काडी लावायला हवी !
अर्थात , ५०  वर्षानंतर माणसाची पचन व्यवस्था कमकुवत होते ,१००  वर्षानंतर घर व ५०० वर्षानंतर देऊळ जीर्ण होते ,त्यांचा जीर्ण उध्दार करावा लागतो . १०००  वर्षानंतर धर्मात नकारात्मक बाबींचा अंतर्भाव होतो , त्यातल्या निरुपयोगी रूढी -परंपरा रुपी कचरा जाळून टाकायला हवा असे म्हटले गेले आहे . असे केल्यास सर्व बाबींचा आपण नव्याने आनंद घेऊ शकू व एक सुसंस्कृत समाज आपल्याला  स्थापन करता येईल  . 

                                शेवटी सर्वात महत्वाचे म्हणजे जिवंत माणूस हा जास्त महत्वाचा आहे . आपण गाईचे अधिकार मानतो पण बाईचे अधिकार मानत नाही . नुसते "सावित्रीच्या लेकी सावित्रीच्या लेकी "म्हटल्याने आपली सुटका नाही . माणूस म्हणजे संत साहित्यात सांगितल्या प्रमाणे हाड,मांस ,आणि रक्ताचा आकार बध्द चिखल आहे . शरीराच्या आत मलमुत्र घेऊन प्रत्येक व्यक्ती फिरत आहे . त्यात महिला आणि पुरुष यांत काहीही फरक नाही . कुणाला कबरी पाशी जाऊ दयायचे नाही, कुणाला चौथऱ्यावर जाऊ दिले जात नाही हे त्यांच्या मुलभूत अधिकारांवरचे आक्रमण मानले पाहिजे . जर देवाच्या आज्ञेच्या विरुध्द महिला दर्शन घेऊ इच्छित असतील ,तर त्यांना शिक्षा करायचा  देवाचा अधिकार आहे  . देव आणि महिला यांच्यात ,तुम्ही-आम्ही आणि त्या ट्रस्ट ने तरी का पडायचे ?

धनंजय जुन्नरकर 
सचिव , मुंबई काँग्रेस ,
पदवी ,मानवी हक्क ,यशवंतराव चव्हाण विद्यापीठ ,नाशिक