Monday 7 September 2015

परम आदरणीय चि . गिरीष बाबा , सप्रेम नमस्कार !


वृत्तपत्र हाताशी आले  ।  " संपादके  " काय केले ? 

परम आदरणीय चि . गिरीष बाबा , सप्रेम नमस्कार ! 

आपला दि ७ सप्टेम्बर २०१५ चा " मग परिवारे काय केले ? " हा अग्रलेख वाचला . सुरवातीला तुमचे अग्रलेख वाचून चिड यायची ,संताप व्हायचा ,पण आता तुमच्या लिखाणाची कीव येते . महाराष्ट्रात किंबहुना देशात संपादकाच मालक असण्याची उदाहरणे कमीकमी होत गेल्यामुळे लेखातला परखडपणा व प्रामाणिक पणा देखील कमीकमी होत गेला हे कटू सत्य आता लोक पचवू लागले आहेत . आपला   लेख समाजाचे प्रबोधन करणारा लेख वाटण्यापेक्षा हुशार वकिलाने अतिरेक्यांचे वकीलपत्र घेतल्या सारखा वाटतो . अशा खटल्यांमध्ये वकील स्वतःच्या बुद्धी कौशल्याने खटला लांबवू शकतो परंतु गुन्हेगाराला शिक्षेपासून वाचवू शकत नाही . 
राज सत्ता निरंकुश कधीच नसते . तिच्या कडे बघण्याच्या दृष्टीकोनातून तिची सापेक्षता आपल्याला ठरवता येते . जेंव्हा राजसत्ता लोकभावनेचा अनादर करत असते तेव्हा आपण म्हणतो लोकांचा राजसत्तेवर अंकुश नाही . परंतु तेंव्हाच राज सत्तेवरील निर्णय प्रक्रियेत असणाऱ्या लोकांचा त्यावर संपूर्ण अंकुश असतो . त्यामुळे महाभारतातील भीष्मांचे  उदाहरण आपल्या काहीच कामाचे नाही . भीष्मांचा  सल्ला कौरवांनी मानला असता तर महाभारत घडलेच नसते . 
आपण रा.  स्व . संघाला भीष्म पितामह ,विष्णुगुप्त ,चाणक्य ,आचार्य विक्रमवेद ,छत्रपतीं शिवाजी महाराज यांच्या मातोश्री  जिजाबाई यांच्या पंगतीत नेले या बद्दल आपल्या विचारांची किव येते . भीष्म पितामह कौरवांच्या दरबारी पगारी मनसबदार नसतील परंतु बरेच संपादक आणि वृत्त पत्र समूहाचे मालक भाजपच्या दरबारातील मनसबदार झाले आहेत  हे  लोकांना आता समजू लागले आहे. 
डाव्यांना तुम्ही अनुल्लेखाने मारा  पण ,मार्कस ,लेनिन ,रशिया , चिन , पॉलिट ब्युरो इथ पर्यंत उदाहरणे द्यायची आपल्याला काहीच गरज नाही . आम्हाला किंबहुना राजकारणातील प्रत्येकाला भाजपा आणि रा.  स्व . संघ यांच्यातील संबंध माहित आहेत . आम्हाला या संबंधांची अडचण नाही . अडचण भाजपा आणि रा.  स्व . संघाला वाटत होती . आमचे काहीच संबंध नाही असे हे दोघे वारंवार सांगायचे . हे खोटे ते आपल्या सवयी प्रमाणे रेटून बोलायचे . आता लोकांना हे कळू लागले आहे . रा.  स्व . संघ केवळ सांस्कृतिक संघटना होती तर त्यांच्या तीन तीन दिवस चालणाऱ्या शिबिरात पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्री मंडळाच्या संगीत एकांकीका ,समूह नृत्याचे प्रयोग ठेवले होते काय ? आम्ही भाजपचे प्रगती पुस्तक पाहत नाही हे रा.  स्व . संघाच्या प्रवक्त्यांनी राष्ट्रीय वाहिन्यांवर कंठ शोष करत सांगायचे , नंतर मागच्या दाराने स्वतःच्या पगारी मनसबदारांना वृत्तपत्रातून लेख लिहायला लावायचे हा विरोधाभास उघड होत आहे . 
अग्रलेखाच्या सहा कॉलम पैकी साडेपाच कॉलम मध्ये भाजप वगळता इतर पक्षांना झोडायचे आणि अर्ध्या कॉलम मध्ये " अरे लबाडा " म्हणत भाजपला कुरवाळत टपली मारायची व लेख समतोल केला असे दाखवायचे यात काही मजा येत नाही . मा सोनिया गांधी , मा राहुल गांधी ,रोबर्ट वधेरा ह्यांचे जेथे जेथे चुकेल तेथे तेथे  त्यांच्यावर तुम्ही टिका करा ,तो तुमचा अधिकार आहे . परंतु तुमच्या लेखणीशी प्रतारणा होणार नाही याची काळजी घ्या . "लोकमान्य लोकशक्ती "ह्या आपल्या घोषवाक्याची आठवण ठेवा त्याचे " भाजप मान्य , संघ शक्ती " होऊ देऊ नका . 
समर्थांनी " राजपद हाताशी आले । मग " परिवारे " काय केले ? असा प्रश्न विचारला होता , त्यांना " गांधी परिवार " अपेक्षित होता की संघ परिवार अपेक्षित होता असे असे मानसीक द्वंद्व आपल्या मनात असावे असे वाटते . पण आपल्या असल्या विचारांचाही आम्हाला आता राग येत नाही . फक्त कीव येते . 

धनंजय जुन्नरकर , 
सचिव , मुंबई काँग्रेस ,
 प्रवक्ता मुंबई काँग्रेस . 
9930075444