Tuesday 23 February 2016

इलेक्ट्रॉनिक मिडिया आणि त्यांचा घसरता दर्जा !



इलेक्ट्रॉनिक मिडिया आणि त्यांचा घसरता दर्जा !
                                                                                                   धनंजय जुन्नरकर 
                                                                                         सचिव , मुंबई काँग्रेस 

चौकट 
राष्ट्रीय प्रसारमाध्यमांच्या बातम्या ,चर्चा ,त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न ,त्यातून मिळणारे सकस वैचारिक  खाद्य ,एन्कर व त्यांचे वर्तन ह्या विषयी खोलात ,तपशीलात जाऊन विचार करायची गरज आहे . आत्ता पर्यंतचा अनुभव फार चांगला नाही .  राष्ट्रीय व राज्यीय वाहिन्यांच्या प्राईम टाईम मध्ये होणाऱ्या चर्चेत ,"मुद्द्याची लिंक लागायला लागली की ते ब्रेक घेतात " , की " लिंक लागूच नये म्हणून ब्रेक घेतात " हे न उलगडणारे कोडे आहे . ह्या वाहिन्यांच्या सुधारणेला खूप वाव आहे . पण , त्यांना सुधारण्याची इच्छा आहे का ? हा देखील महत्वाचा प्रश्न आहे . काही वाहिन्यांनी लोकशाहीच्या "चौथ्या खांबाची 'अवस्था मंडपवाल्याच्या बांबू सारखी केली आहे . तुम्ही फक्त पैशांचे काय ,तेवढ बोला , बाकी मंडप तयार आहे .!





"पत्र व्यवसाय हा जरी धंदा असला, तरी पत्रकारांची वृत्ती हा मात्र एक महान धर्म आहे . धंद्याला स्वरूप द्यावे ,पण धर्माचा मात्र धंदा करू नये . जनताजीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात क्रांती व्हावी म्हणून ,पत्रकारांच्या लेखणी -लेखणी मधून क्रांतीरसाच्या चिळकांड्या उडाव्यात आणि वृत्तपत्रे ही क्रांतीरसाची कारंजी व्हावीत . जनता क्रांतीचा जयजयकार करणे हाच खरा पत्रकाराचा धर्म आहे". पत्रकारितेवर आचार्य अत्रे यांचे हे मत होते . 
गेल्या काही दिवसातल्या बातम्या आणि काही इलेक्ट्रोनिक माध्यमांच्या एन्करांची (anchor) भाषा पाहिल्यावर अत्रे नक्कीच म्हणाले असते की गेल्या १०,००० वर्षात असे मूर्ख एन्कर पाहिलेले नाहीत . पत्रकार हा बातमी मागची बातमी शोधणारा बुद्धिमान व्यक्ती असतो किंबहुना असला पाहिजे . खोट्या पुड्या सोडून बातम्या तयार करणारा व्यक्ती पत्रकार असू शकत नाही . 

भारतात ७०,००० पेक्षाही अधिक वर्तमान पत्रे ,६९० वाहिन्या आहेत . त्यात ८० वाहिन्या बातम्यांवर आधारित आहेत . भारतात रोज १० कोटी वर्तमान पत्रे विकली जातात.  ह्या मुळे पत्रकारांची जबादारी जास्त वाढते . गेल्या काही महिन्यातील महत्वाच्या विषयांवरच्या बातम्या पहिल्या ,उदा - दादरी कांड ,रोहित वेमुला ,सलमान खानचे  हिट अन्ड रन ,संजय दत्त चे पेरॉल वर बाहेर येणे आणि आत्ताचे जे.एन.यु. प्रकरण ,तर झालेले वार्तांकन आपली वैचारिक भूक भागवत नाही . बातम्या व त्यावर जाणिव पूर्वक घडवून आणलेल्या चर्चा सामान्य लोकांची गरज वाटण्या पेक्षा वाहिन्यांचा किंवा त्या विषयाने ज्यांचा फायदा होईल अशांचा वैयक्तिक अजेंडा वाटतो .  

पत्रकार हा सरकारच्या विरोधातला, निवडून न आलेला जनतेचा प्रतिनिधी असतो ,असे मला वाटते
काही मोठया वाहिन्यांच्या पत्रकारांनी ,त्यांच्या एन्कारांनी आपले सत्व आणि स्वत्व हरवले आहेत असे वाटते . ,किंवा त्या वाहिन्यांच्या मालकांचे हितसंबंध  जपण्याच्या नादात आपण मुळचे पत्रकार आहोत याचा त्यांना विसर पडलेला आहे . त्यांच्या बातम्या आणि चर्चा ह्या बातम्या न वाटता ,गल्ली बोळातल्या सार्वजनिक उत्सवातील मनोरंजना साठी बोलाविलेल्या वाद्यावृंदा प्रमाणे वाटत आहेत . 
जे.एन.यु. प्रकरणात कन्हैय्या कुमारच्या तोंडातून नेघालेले " हमे चाहिये आझादी " हेच वाक्य प्रसारमाध्यमांनी  दाखविले . भुकमरी से ,पुंजीवाद से ,सामंथवाद से ,मनुवाद से ,गरिबी से ही वाक्ये दाखवीली गेली नाही . उलट दुसऱ्या व्हिडियो तील काश्मिरी मुलांनी एबिविपि च्या मुलांच्या घोषणांना चिडून,प्रतीउत्तर देताना दिलेल्या घोषणा जोडून दाखविल्या . ज्या मुलांचा जे.एन.यु. शी संबंध नाही ,त्यांचा संबंध जोडला ,तसेच :वन्दे मातरम बोला ,भारत माता की जय बोला . नाहीतर तुम्ही देश द्रोही अशी ही दमबाजी केली गेली . भारत माता की जय बोललो आणि भारताचा झेंडा हातात घेतला तर कुणालाही देश द्रोही ठरवायचे व मारायचे लायसन्स आपल्याला मिळते  काय ? या वर किती पत्रकारांनी प्रश्न विचारले ,ते समजले नाही . पत्रकार आणि त्यांचे मालक गुप्तपणे आपले व्यावसायिक हीत जपण्यासाठी विशिष्ट विचारसरणी राबवण्यासाठी काम करू लागले ,तर अराजकतेला फुकटचे निमंत्रण आहे . प्रसारमाध्यमांना आपण लोकशाहीचा चौथा खांब म्हणतो ,परंतु काही भ्रष्ट लोकांनी ह्या खांबाला पैशाची थैली लटकावली तर हा खांब पैशाच्या दिशेला झुकू लागतो ,हे दृश्य  देशाचे दुर्दैव आहे . 

आरुषी हत्याकांड ,शिनाबोरा हत्याकांड ,२६/११ चा अतिरेकी हल्ला ,अभिनेते ,उद्योगपतींची बिघडलेली मुले ह्यांची हिट अन्ड रन प्रकरणे ,तसेच रोहित वेमुला ,कन्हैय्या कुमार ह्या बाबतीतील वार्तांकन प्रामाणिक तेच्या कसोटीला धरून नव्हते .  आपण बातम्या पाहत आहोत की  सीआयडी ,क्राईम पेट्रोल ,सावधान इंडिया कार्यक्रम पाहात आहोत काही कळत नाही . 
राजाराम मोहन राय ,दादाभाई नौरोजी ,लोकमान्य टिळक ,गोपाल कृष्ण गोखले ,अशा नेत्यांनी साप्ताहिके ,वृत्तपत्र काढली ,जनतेच्या हक्कांसाठी लिहिले . जनतेला नवीन दृष्टी दिली ,त्यांच्यात एकता निर्माण केली . अन्यायाला वाचा फोडण्याचे काम प्रसारमाध्यमांनी केले . १९९४ मध्ये युनिसेफ ने युध्द आणि नैसर्गिक विपदेत पिडीतांना मदत करण्यासाठी प्रसार मध्यामांचीच मदत घेतली होती . अमेरिकन लष्कराने इराक युद्धाच्या वेळी केलेल्या अत्याचाराला माध्यमांनीच वाचा फोडली होती . जेसिका लाल ,नितीश कटारा यांचे  खटले  माध्यमांच्या दबावापायी उघडले  गेले  .

आत्ता काही वाहिन्यांनी देशभक्तीच्या नावाने धुमाकूळ घातला आहे . परंतु त्यांनी केलेल्या चुका व अप्रामाणिक पणामुळे त्यांच्या वर पुन्हा विश्वास ठेवायची हिम्मत होत नाही . २४ तास काय दाखवायचे ह्यामुळे व टिआरपी च्या रेट्या पायी अतिरंजित पणा व उत्सवीपणा ,नाटकीपणा  वाढत चालला आहे . चर्चेसाठी समोर बसलेले प्रवक्ते ,तज्ञ ,पाहुणे ह्यांचातला आणि एन्कर मधला संवाद हा नळावरच्या भांडणासारखा वाटतो . चर्चा करताना एन्कर ने असे प्रश्न मांडावेत जेणेकरून  आपोआप अशी उत्तरे मिळतील की लोकांना आपले मत तयार करता येईल . 

काही एन्कर स्वतःला न्यायमूर्ती समजतात व आपल्या समोर बसलेले प्रवक्ते हे बलात्कारी ,खंडणीखोर ,पाकीटमार असावेत अशा रितीने  प्रवक्त्यांच्यावर ओरडतात . 
हिंदू शास्त्राच्या संकेतानुसार माणसाच्या पाप पुण्याचा हिशेब चित्रगुप्ताच्या वहीत लिहिलेला असतो . त्याच्यावर त्याचे स्वर्ग किंवा नरकात जाणे ठरते . हिंदी मराठीतल्या काही वाहिन्या ,तशा प्रकारे प्रवक्त्यांवर ओरडत असतात व "बघा पडद्यावर " लोक तुमच्या साठी काय म्हणतात,असे म्हणून त्यांची  उलट तपासणी घेत असतात  . 

राष्ट्रीय वाहिन्या म्हणून ज्या वाहिन्या आहेत त्यांना राष्ट्रीय वाहिन्या का म्हणावे ,हे समजत नाही . मोठ्या  उद्योगपतींचे पाठबळ आहे ,देशभर पत्रकार नेमता येतात . त्यांना पगार देता येतो.  म्हणून त्या वाहिन्या राष्ट्रीय आहेत .? की , राष्ट्रीय प्रगतीसाठी ,राष्ट्राच्या एकतेसाठी , जनताभिमुख पत्रकारिता करतात ,म्हणून  त्यांना राष्ट्रीय म्हणावयाचे हा यक्ष प्रश्न आहे .चार तासाच्या पावसाने शहर तुंबले तर २४ तास बातम्या देणारे पत्रकार मात्र ,एक महिला १० किलोमीटरहून पाणी आणते हि बातमी २० सेकंद ही दाखवत नाही . २६/११  च्या हल्ल्यात हॉटेल ताज वरचे वृत्तांकन ६० तास चालले ,परंतु सीएसटी स्टेशन वरच्या हल्ल्याच्या बातम्या किती वेळ दाखविल्या गेल्या ? ताज मध्ये पैसेवाल्यांच्या जिवन मरणाचा प्रश्न होता ,सीएसटी स्टेशन वर मरणारे तर ,तुमच्या आमच्या सारखे सामान्य होते . आपल्या जगण्या मरण्याला काय टिआरपी मिळणार ?

राष्ट्रीय प्रसारमाध्यमांच्या बातम्या ,चर्चा ,त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न ,त्यातून मिळणारे वैचारिक सकस खाद्य ,एन्कर व त्यांचे वर्तन ह्या विषयी खोलात ,तपशीलात विचार करायची गरज आहे . 
आत्ता पर्यंतचा अनुभव फार चांगला नाही . राष्ट्रीय व राज्यीय वाहिन्यांच्या प्राईम टाईम मध्ये होणाऱ्या चर्चेत ,"मुद्द्याची लिंक लागायला लागली की ते ब्रेक घेतात " , की " लिंक लागूच नये म्हणून ब्रेक घेतात " हे न उलगडणारे कोडे आहे . ह्या वाहिन्यांच्या सुधारणेला खूप वाव आहे . पण , त्यांना सुधारण्याची इच्छा आहे का ? हा देखील महत्वाचा प्रश्न आहे . काही वाहिन्यांनी लोकशाहीच्या चौथ्या खांबाची अवस्था मंडप वाल्याच्या बांबू सारखी केली आहे . तुम्ही फक्त पैशांचे काय ,तेवढ बोला , बाकी मंडप तयार आहे . 

धनंजय जुन्नरकर 
सचिव , मुंबई काँग्रेस 
सदस्य ,प्रसार माध्यम समिती ,मुंबई काँग्रेस 

Friday 12 February 2016

महिलांचे देवदर्शन आणि बेगडी पुरोगामित्व धनंजय जुन्नरकर MAHILANCHE DEVDARSHAN AANI BEGADI PUROGAMITV


महिलांचे देवदर्शन आणि बेगडी पुरोगामित्व 
धनंजय जुन्नरकर 
सचिव , मुंबई काँग्रेस ,
पदवी ,मानवी हक्क ,यशवंतराव  चव्हाण विद्यापीठ ,नाशिक 
                                                                                                                                                                 djunnarkar74@gmail.com



चौकट 
शेवटी सर्वात महत्वाचे म्हणजे जिवंत माणूस हा जास्त महत्वाचा आहे . आपण गाईचे अधिकार मानतो पण बाईचे अधिकार मानत नाही . नुसते "सावित्रीच्या लेकी सावित्रीच्या लेकी "म्हटल्याने आपली सुटका नाही . माणूस म्हणजे संत साहित्यात सांगितल्या प्रमाणे हाड,मांस ,आणि रक्ताचा आकार बध्द चिखल आहे . शरीराच्या आत मलमुत्र घेऊन प्रत्येक व्यक्ती फिरत आहे . त्यात महिला आणि पुरुष यांत काहीही फरक नाही . कुणाला कबरीपाशी जाऊ दयायचे नाही, कुणाला चौथऱ्यावर जाऊ दिले जात नाही ,हे त्यांच्या मुलभूत अधिकारांवरचे आक्रमण मानले पाहिजे . जर देवाच्या आज्ञेच्या विरुध्द महिला दर्शन घेऊ इच्छित असतील ,तर त्यांना शिक्षा करायचा  देवाचा अधिकार आहे . देव आणि महिला यांच्यात तुम्ही-आम्ही आणि त्या ट्रस्ट ने तरी का पडायचे ?
***************************************************************************************************************************************************************************************************************


                                        हाजी अली आणि शनि शिंगणापूर ही  धार्मिक स्थाने सध्या वादाची आणि मुलभूत अधिकारांच्या कक्षा रुंदावण्याच्या चर्चेची केंद्र बनलेली आहेत . ही दोन्ही प्रकरणे वेगवेगळ्या धर्माची आहेत परंतु,महिलांना प्रतिबंध करण्याच्या बाबतीत समान आहेत .हाजी अली दर्ग्यात गेली कित्येक वर्ष दर्ग्यातील कबरीला हात लावून महिला प्रार्थना करू शकत होत्या . परंतु,२०१२ पासून दर्ग्याच्या विश्वस्त मंडळाने महिलांना गाभाऱ्यात प्रवेश बंदी केली आहे . शनि देवस्थानच्या विश्वस्त मंडळानेही महिलांना चौथऱ्यावर जायला बंदी केली आहे . दोन्ही धर्माच्या महिला याविरुध्द आंदोलन आणि कोर्ट कचेऱ्या करत आहेत . केरळच्या शबरिमल देवस्थानाचे प्रकरण असेच असून, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी निर्णय राखून ठेवला आहे . त्यामुळे कनिष्ठ न्यायालयांनी देखील आपला निर्णय दिलेला नाही . 
                                   धर्म आणि त्या संबंधी वाद हे, एक प्रकारचे" आग्या मोहोळ " असते, अशी जगातल्या सर्व राजकीय पक्षांची धारणा असते . जे राजकीय पक्ष फक्त धर्म केंद्रित राजकारण करतात ते ह्याला अपवाद आहेत . ते याच्यातून आपला फायदा तपासत असतात . राजकीय सुधारणा आधी की सामाजिक सुधारणा आधी यावर स्वातंत्र्यापूर्वी वाद झडत होते . धर्माचे अवडंबर न माजविणे आणि सामाजिक सुधारणांना गती देणे, हे सर्वांचे प्राथमिक कर्तव्य असले पाहिजे . लोकांच्या सारासार बुद्धीला तार्किक आणि वैज्ञानिक दृष्टीचे कोंदण चढविणे गरजेचे आहे . 
              " यत्र नार्यस्तु पुजयन्ते ,रमन्ते तत्र देवता - अर्थात नारीला जेथे  पूजनीय मानली जाते -तिचा सन्मान केला जातो, तेथे देव निवास करतात . मग जेथे देव निवास करतात तेथेच आपण नारीला जाऊ देणार नसू ,तर मग ही उक्ती खोटी आहे असे म्हणावे लागेल किंवा मग तसे वागावे तरी लागेल . 
  शनि शिंगणापूरच्या दर्शनाच्या महिला प्रवेश बंदीची परंपरा ४०० वर्षांची ,केरळच्या शबरिमल देवस्थानाची परंपरा ५०० वर्षांची ,हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश बंदी नाकारण्याची परंपरा २०१२ पासून आहे . अशा परंपरांचा अभिमान बाळगायचा की त्यात सुधारणा करायची हा महत्वाचा प्रश्न आहे . 
  वर्ण व्यवस्था ,वर्ग व्यवस्था यावर स्वातंत्र्यपूर्वी आणि त्या नंतरही चर्चा आंदोलने चालू आहेत . जाती भेद मानून स्वतःच्या अपत्यांना "ओनर किलिंग "च्या नावाने मारून टाकायचे ,  असे आदेश देणाऱ्या अनधिकृत जात पंचायती ,खाप पंचायती चालवायच्या, हे आपण अजूनही पाहत आहोत . 
  ताजमहल मधील मुमताजची कबर ,फतेहपुर सलीम चिश्ती  दर्गा ,नागपूर येथील ताजुद्दीन बाबा दर्गा व अजमेर शरीफ दर्ग्यात महिला" मझार "पर्यंत जाऊ शकतात . पण २०१२ च्या हाजी अली दर्ग्याच्या विश्वस्त मंडळाच्या फतव्या पासून महिला हाजी अली यांच्या दर्ग्यात मझारी पर्यंत जाऊ शकत नाहीत . हे भेद आपण का पाळायचे ?असे महिलांना वाटले असल्यास नवल नाही . जगातले सर्व धर्म गुरु महिलांच्या हक्कांच्या विरुध्द एक असतात हे वारंवार दिसलेले आहे . पद्मश्री ,पद्म भूषण किंवा तत्सम सन्मान मिळविणारे साहित्यीक अशा धार्मिक वादांवर सहसा लिहित नाहीत . कशाला उगाच वाकड्यात शिरा ?असा त्यांचा आविर्भाव असतो . काही विद्वान लोक स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचे स्थान आहे असे दर्शविणारे तर काही पंडित ,अगदी त्याच्या विरुध्द विचाराचे श्लोक पुरावा म्हणून दाखवतात . टि आर पी च्या नादी लागलेली दृश्य प्रसार माध्यमे १०० वेळा ब्रेक घेऊन प्रश्नाच्या चर्चेचा पार चोथा करून टाकतात .उथळ चर्चा करण्यापेक्षा खोलात जाऊन चर्चा करायची कोणाचीच इच्छा नाही . 
                                         हिंदू धर्मातील जुनाट पुराणवादी रूढी , परंपरा बदलण्यासाठी राजाराम मोहन रॉय ,महात्मा ज्योतिबा फुले ,सावित्रीबाई फुले यांनी संपूर्ण आयुष्य वेचले . डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी तर हिंदू धर्माचा त्याग केला . बरीच आंदोलने ,लढा , दिल्या नंतर अनेक सुधारणा झाल्या . १९२९ चा बाल विवाह विरोधी कायदा ,१९६१हुंडा प्रतिबंध कायदा ,१९६९ घटस्फोट कायदा ,१९८७ सती प्रथे विरुध्द कायदा ,१९९४ लिंग निदान प्रतिबंध कायदा आपण केला . देवदासी प्रथा ,विशेष विवाह ,असे कायदे वेद ,शास्त्र ,पुराणात लिहिले होते काय ?मंदिर ,मस्जीत मध्ये लाउड स्पीकर लावा ,असे भगवद गीतेत किंवा पवित्र कुरआन याच्यात लिहिले आहे काय ?समुद्र ओलांडायचा नाही असे, जवळ -जवळ पूर्वीच्या सगळ्यांनी सांगितले आहे . तर मग आता कोणत्या धर्मातील लोक समुद्र पार करत नाहीत ? 
                         पुरुषसत्ताक विचार आणि धर्म मार्तंडांनी महिलांना मतदानाचा अधिकारही नाकारला होता . निरनिराळ्या देशातील महिलांनी या साठी प्रचंड लढा दिला ,तेंव्हा हा अधिकार मिळाला . १८९३ ला न्यूझीलंड ने ,१९१८ मध्ये इंग्लंड ने १९२० मध्ये अमेरिकेने तर सौदी अरब च्या शाह अब्दुल्ला ह्यांनी २०११ला महिलांना मतदानाचा तर २०१५ ला निवडणूक लढविण्याचा अधिकार दिला . 
हिंदू संस्कृतीचे अवलोकन केले असता ब्रम्हा ,विष्णु , महेश हे सृष्टीचे रचेते आहेत .अत्री ऋषी यांच्या पत्नी अनुसूया माता ह्यांनी आपल्या तपोबलाने ह्या तिन्ही देवांचे  बाळांमध्ये  रुपांतर केले होते . सृष्टीच्या रचेत्यांचे महिला ,जर बाळ बनवू शकत असतील तर इतर देवांचे दर्शन घ्यायला स्त्रियांना कोण कशी काय बंदी घालू शकेल ? 
                                         भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत धर्म निरपेक्ष व लोकशाही गणराज्य हे शब्द आहेत . सर्वोच्च न्यायालयाने आपल्या अनेक निर्णयातून राज्य घटनेच्या सरनाम्याचे महत्व सांगितले आहे . ह्यात सामाजीक ,आर्थिक आणि राजनैतिक विचार अभिव्यक्ती ,विश्वास ,श्रद्धा व उपासना ह्याचे स्वातंत्र्य आहे . भारत सरकार व राज्य सरकारला जे अधिकार प्राप्त आहेत ते लोकांपासून मिळालेले अधिकार आहेत . त्यात महिलांचाही समान सहभाग आहे . भारतीय राज्य घटनेचे कलम १४ हे समानता तर कलम १५ नुसार धर्म,वंश ,जात ,लिंग ,जन्म स्थान ह्यावरून कोणतेही भेदभाव होणार नाही ,हे दर्शविलेले आहे .मानवी हक्कांचा जाहीरनामा कलम २ मध्ये ह्याच बाबी सांगितलेल्या आहे . भारतीय राज्य घटनेचे कलम २५ नुसार समानतेने सारासार विचार करायचे आणि पेशा आचारण्याचे -धर्म प्रसाराचे स्वातंत्र्य आहे . मानवी हक्कांचा जाहीरनामा कलम १४ आणि १८ नुसार देखील हेच सांगितले आहे . धर्माद्वारे भेद भाव करण्याचे  अधिकार कोणालाच नाहीत . " जेंव्हा एखाद्या ऐतिहासिक कारणांनी "संधी बाबत प्रचंड असमानता" निर्माण होते ,तेंव्हा अंतिम ध्येया पर्यंत समानता पोहोचविण्यासाठी " न्याय्य भेद " म्हणजेच पॉजीटिव्ह डिसक्रीमिनिशेन किंवा विश्वास दर्शक कृती केली जाऊ शकते . आंतर राष्ट्रीय कायद्याच्या हक्कांमध्ये " विशेष ऊपाय " केले जाऊ शकतात . "
                                         राजकीय पक्ष , धार्मिक गुरु ह्यांच्यापेक्षाही मानव म्हणून मिळालेले अधिकार सर्व श्रेष्ठ आहेत . त्यामुळे मानव म्हणून महिलांच्या अधिकारांचे महत्व जास्त आहे . हिंदू संस्कृतीत अहिल्या ,द्रौपदी ,सीता ,तारा ,मंदोदरी  ह्या पाच पतिव्रता होत्या . त्यांच्या स्मरणाने देखील पाप मुक्त होतो ,असे श्लोक दर्शवितात . शेवटी त्यांनाही पुरुष सत्ताक पद्धतीतच राहावे लागले असा इतिहास आहे . जेथे ह्या महान स्त्रियांना अग्नी परीक्षा चुकली नाही तेथे सामान्य महिलांना कसे काय अधिकार मिळणार ?
असे म्हणतात की , ५० वर्षानंतर भोजनात बदल करायला हवा ,
                         १००  वर्षानंतर घर पाडायला हवे ,
                        ५००  वर्षानंतर देऊळ पाडायला हवे ,
                        १०००  वर्षानंतर धर्माला काडी लावायला हवी !
अर्थात , ५०  वर्षानंतर माणसाची पचन व्यवस्था कमकुवत होते ,१००  वर्षानंतर घर व ५०० वर्षानंतर देऊळ जीर्ण होते ,त्यांचा जीर्ण उध्दार करावा लागतो . १०००  वर्षानंतर धर्मात नकारात्मक बाबींचा अंतर्भाव होतो , त्यातल्या निरुपयोगी रूढी -परंपरा रुपी कचरा जाळून टाकायला हवा असे म्हटले गेले आहे . असे केल्यास सर्व बाबींचा आपण नव्याने आनंद घेऊ शकू व एक सुसंस्कृत समाज आपल्याला  स्थापन करता येईल  . 

                                शेवटी सर्वात महत्वाचे म्हणजे जिवंत माणूस हा जास्त महत्वाचा आहे . आपण गाईचे अधिकार मानतो पण बाईचे अधिकार मानत नाही . नुसते "सावित्रीच्या लेकी सावित्रीच्या लेकी "म्हटल्याने आपली सुटका नाही . माणूस म्हणजे संत साहित्यात सांगितल्या प्रमाणे हाड,मांस ,आणि रक्ताचा आकार बध्द चिखल आहे . शरीराच्या आत मलमुत्र घेऊन प्रत्येक व्यक्ती फिरत आहे . त्यात महिला आणि पुरुष यांत काहीही फरक नाही . कुणाला कबरी पाशी जाऊ दयायचे नाही, कुणाला चौथऱ्यावर जाऊ दिले जात नाही हे त्यांच्या मुलभूत अधिकारांवरचे आक्रमण मानले पाहिजे . जर देवाच्या आज्ञेच्या विरुध्द महिला दर्शन घेऊ इच्छित असतील ,तर त्यांना शिक्षा करायचा  देवाचा अधिकार आहे  . देव आणि महिला यांच्यात ,तुम्ही-आम्ही आणि त्या ट्रस्ट ने तरी का पडायचे ?

धनंजय जुन्नरकर 
सचिव , मुंबई काँग्रेस ,
पदवी ,मानवी हक्क ,यशवंतराव चव्हाण विद्यापीठ ,नाशिक 

Thursday 28 January 2016

नेहरू ,बोस आणि भाजपाचा विलाप ,धनंजय जुन्नरकर सचिव ,मुंबई काँग्रेस



नेहरू ,बो
स आणि भाजपाचा विलाप 

        धनंजय जुन्नरकर , सचिव ,मुंबई काँग्रेस  9930075444


नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या ११९व्या जयंतीला त्यांच्याशी संबंधीत १०० फाइली पंतप्रधान मोदी यांनी नेताजींच्या कुटुंबीयांकडे सुपूर्त केल्या . त्या आधी पश्चिम बंगालच्या मुख्य मंत्री ममता ब्यनार्जी   ह्यांनी सप्टेंबर महिन्यात ६४ फाइली व १२०००कागदपत्रे सार्वजनिक केली होती . चालू वर्षात येणाऱ्या निवडणुकांवर लक्ष ठेवून आपापली रणनीती हे दोन्ही पक्ष आखत आहेत, हे समजायला भारतीय जनता काही दुध खुळी नाही . या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी ह्या आधी आपल्या सरकारच्या कारकिर्दीत हा निर्णय का घेतला नाही याचे उत्तर दोघांकडेही नाही . जनमानसाच्या मुख्य मुद्द्यांवरून लक्ष दुसरी कडे वळवावे व आपण आपल्या कामांनी आता निवडून येऊ शकत नाही हा विचार पक्का झाल्याने हे प्रकार सुरु झाले आहेत . दिल्ली , बिहार विधानसभेत सपाटून मार खाल्ल्यावर आणि भाजपचे अच्छे दिन संपले हे कळल्यावर पंतप्रधान नरेंद्र  मोदींनी भावनेला हात घालण्याच्या आपल्या मूळ तत्वाकडे उडी घेतली . 
स्वातंत्र्य लढयात दूरदूर पर्यंत कोणताही सहभाग नाही ,स्वातंत्रपूर्व लढयातील कोणत्याही महत्वाच्या नेत्याने आर एस एस ची ,हिंदू महासभेची विचार धारा मान्य केली नाही ,त्यामुळे विजयी गाथा ,विजयी ठेवा ,स्मारके किंवा सांगण्या सारखे काही नाही .म्हणून भाजपा  हतबल आहे. स्वतः कडे काही नाही तर विरोधी पक्षाच्या महत्वाच्या लोकांवर खोट्या आरोपाची राळ उडवून द्यायाची हा स्वतःचा जुना उद्योग भाजपाने पुन्हा सुरु केला आहे . काही महिने विरोधी पक्ष -आरोप नाकारण्यात मश्गुल असेल त्यात आपण निवडणुका जिंकून घेऊ अशी रणनीती आहे . पंडित नेहरू -गांधी , नेहरू -पटेल  असे खोटे वाद करून झालेले आहेत , यावेळी  नेहरू -नेताजी बोस असा नवा वाद लावून दयायचे काम त्यांनी चालू केले आहे . नेताजींवर कॉंग्रेस ने अन्याय केला , नेताजींना नेहरू प्रतिस्पर्धी मानत होते ,त्यांच्या घरावर २०वर्षे पाळत ठेवली गेली असे या वेळी केलेले आरोप आहेत . या सर्व आरोपांचे कॉंग्रेस खंडन करते . मुळात नेताजी आणि नेहरू यांच्यावर काही भाष्य करायचे असल्यास, आपल्याला त्यांच्या राजकीय जीवनाच्या महत्वाच्या पैलूंची कठोर समीक्षा करावी लागेल ., नेहरू आणि नेताजींचे स्वातंत्र्या बाबतचे विचार ,लोकशाही बाबतचे विचार ,त्या बाबतचे केलेले कार्य ,धोरणे यांचा प्रामुख्याने विचार करावा लागेल . 
दोन्ही महान नेत्यांचा जन्म सुख संपन्न घरात झाला . शिक्षण चांगल्या प्रकारे झाले . नेहरू नेताजींपेक्षा ८ वर्षाने जेष्ठ होते. त्यामुळे दोघांनाही मिळालेल्या वातावरणात काही विशेष फरक नव्हता . 
नेताजींना सुरवाती पासून भव्य दिव्यतेची आवड होती . वेळोवेळी त्यांनी त्याचे दर्शनही घडवले . ज्याच्या साम्राज्याचा सूर्य मावळत नाही अशा ब्रिटीश सरकार विरुध्द सैन्यलढा  देऊन," चलो दिल्ली "चा नारा देणे , १९२८ च्या कॉंग्रेस अधिवेशनात २००० स्वयंसेवकांना सैनिकी पोशाखात गार्ड ऑफ ऑनर चे आयोजन करणे ,कॉंग्रेस च्या ५१व्या  अधिवेशनात ५१सुवासिनी, ५१स्वागताच्या कमानी , ५१बेंडबाजा धारी , ५१बैलांच्या जोड्यांनी खेचणारा रथ यांचे नियोजन केले.  तसाच सोहळा दक्षिण पूर्व आशियात इंडिअन नेशनल आर्मी ,इंडिअन नेशनल लीग चा कारभार हाती घेतानाही केला होता . महात्मा गांधींची अहिंसा वादी वृत्ती ,त्यांची रामराज्य विषयी कल्पना ,आत्मक्लेश करणारी आंदोलने या विषयी त्यांची मते वेगळी होती . त्यामुळे कॉंग्रेसच्या  काही वरिष्ठ नेत्यांची मते त्यांच्याशी पटत नसत. या उलट नेहरूजीचे कुटुंबीय पाश्चिमात्य ,श्रीमंत जीवनशैली जगत  असूनही १९१८ मध्ये गांधीजींच्या संपर्कात आल्यावर सर्व सुखांचा त्याग केला . गांधीजी भारतीय राजकारणात १९१५ मध्ये आले १९१८ पर्यंत म्हणजे तीन वर्षाच्या कालावधीत संपूर्ण देशभर त्यांची ओळख निर्माण व्हायची होती . त्या काळात गांधीजींच्या संपर्कात येऊन नेहरूजी आणि कुटुंबीयांनी सर्व बडेजाव सोडला होता . 
स्वातंत्र्य पूर्व काळापासून कॉंग्रेस मध्ये जहाल -मवाळ ,डावे -उजवे असे गट होते . नेताजींची विचारसरणी जहाल गटाच्या विचारांशी जुळणारी होती . नेहरुजींची विचारसरणी मवाळ परंतु उदारमतवादी होती . भारतीय राजकीय समस्ये बाबत दोघांची मते समान होती . भारताने ब्रिटीशांशी कोणत्याही प्रकारे संबंध ठेवू नये ह्यावर दोघांचेही एकमत होते. भारताने ब्रिटीशांकडून वसाहतींचे स्वातंत्र्य स्वीकारु नये असे दोघांचेही मत होते . दोघांची उद्दिष्टे समान होती परंतु मार्ग वेगळे होते . नेताजींच्या  राष्ट्रनिष्ठेविषयी शत्रू सुद्धा शंका घेणार नाही, इतकी ओजस्विता त्यात होती . नेताजी आणि नेहरूजी यांच्या विचारांमध्ये लोकशाही, अर्थ विषयी धोरणे ,स्वातंत्रोत्तर राबविली जाणारी धोरणे यांत प्रचंड तफावत होती . 
नेताजींच्या मते शत्रूचा शत्रू तो आपला मित्र ही म्हण पक्की होती. जर्मनी व इटली हे ब्रिटनचे शत्रू नेताजींना आपले मित्र वाटत असत. त्यांच्या कार्य प्रणाली प्रमाणे भारतात कारभार चालला पाहिजे असे त्यांना वाटत असे. नेहरूंच्या मते जी राष्ट्रे स्वतःच्या नागरीकांवर अत्याचार करतात ,त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्राची गळचेपी करतात त्यांची मदत नको . ब्रिटीशांकडे असलेल्या सर्व वसाहतींमध्ये भारत सर्व अर्थांनी समृद्ध वसाहत होती . त्याचे आकर्षण नाझी राजवटीला देखील होते . १९३१ साली दुसऱ्या गोलमेज परिषदे नंतर गांधीजी रोमच्या पोप यांची भेट घेण्यासाठी थांबले होते . त्यावेळी मुसोलींनीने  गांधींचा मोठा आदर करायचे ठरविले होते. ते स्वतः गांधीजींच्या स्वागताला गेले असता ,गांधींनी त्यांना बजावले ,की "तुम्ही जे करत आहात ते काही क्षणातच पत्त्याच्या बंगल्या प्रमाणे कोसळणार आहे " . त्यांचा या कृती नंतर त्यांनी गांधीचा नाद सोडून दिला व इतर नेत्यांचा ते शोध घेऊ लागले . १९३३ साली नेताजी जर्मनीला पोहचले असता हिटलर याने, बोस ह्यांची सर्व प्रकारे मदत करावी असे म्हटले होते परंतु ,व्यक्तीशः भेट घेतली नव्हती. एक वंश म्हणून हिटलरचे भारतीय नागरिकांविषयी मत फार घाण होते . त्याच्या "माईन कान्फ "या आत्मचरित्रात तो म्हणतो " इंग्लंड ने त्यांची प्रशासन व्यवस्था हिंदुस्थान च्या हातात दिली किंवा इंग्लंडपेक्षा शक्तिशाली शत्रूने हिंदुस्थान ओढून घेतला तरच इंग्लंडच्या हातातून निसटेल ,अन्यथा नाही. हे वास्तव हिंदुस्थानच्या बंडखोरांच्या कधीच लक्षात येणार नाही. आमचे व इंग्लंडचे संबंध कसेही असोत ,एक जर्मन नागरिक म्हणून मला मनापासून वाटते की हिंदुस्थान इतर कोणत्याही देशाच्या ताब्यात असण्यापेक्षा ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली राहिलेला अधिक चांगला ".  अखेरीस २९ मे १९४२ मध्ये 
हिटलर ने नेताजींची भेट घेतली पण, पुढील १५० वर्षे हिंदुस्थान स्वतंत्र होणार नाही हे सांगितले . 
अशा अनेक उदाहरणांनी आपल्याला नेताजी आणि नेहरूजी या महान नेत्यांच्या वैचारीक द्वांद्वा विषयी सांगता येईल . नेताजींना आकर्षण असलेल्या हिटलरच्या नाझी राजवटीने १९३८च्या मे महिन्यात, मुंबईतील जर्मन वकिलातीमार्फत  नेहरूंना म्युनिक मध्ये राहण्यासाठी निमंत्रण दिले तर ते स्विकारतील का ?अशी विचारणा केली होती परंतु नेहरूंनी ती तात्काळ नाकारली होती . तसेच १९३६ मध्ये मुसोलिनीच्या खासगी प्रतिनिधीने मुसोलिनीच्या पत्नीचा मृत्यू झाला असता सांत्वनपर भेटीचे आयोजन करून कुठेही नाव छापून येणार नसल्या बाबतही सुचविले परंतु, नेहरूंनी ती भेट देखील नाकारली होती . म्हणजे नेहरू यांजकडून कोणतेही प्रयत्न होत नसतानाही, दोन्ही हुकुमशहा त्यांच्याशी संपर्क साधण्याच्या प्रयत्न करत होते . लोकाशाहीच्या विचारांशिवाय इतर कोणताही विचार कॉंग्रेस ला मान्य नव्हता . हुकुमशाही तत्वांना स्वीकारले तर ,आगीतून फोफाट्यात पडणे होईल असे नेहरूंचे मत होते . नेताजींच्या आझाद हिंद सेना व जपानच्या फौजेच्या माध्यमातून  ब्रिटीश सरकारवर विजय मिळवला असता तर ,जपानचे भारता विषयी काय धोरण राहिले असते ह्या प्रश्नाचे उत्तर सापडत नाही . 
कॉंग्रेस पक्षात गांधींचा शब्द अंतिम असायचा . कोणतेही गट तट असले तरी शेवटी मतैक्य व्हायचे . १९३८साली नेताजीं अध्यक्ष झाल्यावर त्यांनी राष्ट्रीय योजना आयोग स्थापन केला त्यांनी त्यांचे आर्थिक विचार मांडले . ते विचार गांधीजींच्या विचारांशी सहमत होणारे नव्हते . नेताजींना रशिया सारखे सूत्रबध्द नियोजन ,जड उद्योगांची आवश्यकता ,कुटुंब नियोजन हवे होते . हे मुद्दे वादग्रस्त असल्याचे शरद बाबूंनी त्यांना सुचविले होते . अशा प्रकारे कॉंग्रेस विचारसरणीच्या विरोधात जाणारी व्यक्ती पुन्हा अध्यक्ष बनू नये, असे गांधीजींना वाटले असावे . त्यांना तेव्हा मौलाना आझाद अध्यक्ष हवे होते परंतु आझादांनी त्यावेळी नकार दिला . तरी १९३९च्या निवडणुकीत नेताजींनी गांधीजींच्या उमेदवाराचा बहुमताने पराभव केला . त्या नंतर ही गांधीजीनी आपल्याला सहकार्य करावे असे त्यांना वाटत होते. आधीची कमिटी ही नेताजीनीच नेमलेली होती . नेताजींनी त्यांना तार करून ,कोणत्याही प्रकारे बैठक घेण्याला परवानगी दिली नाही.  तसा आदेश लेखी पाठविला ,त्यामुळे कमिटीला आपला अपमान झाल्याचे वाटले व त्या १५जणांच्या कमिटी पैकी १२ जणांनी एकत्ररित्या राजीनामे दिले . उरलेल्या तीन जणांमध्ये स्वतः नेताजी ,त्यांचे बंधू शरद बाबू ,व नेहरूजी होते . पुढे नेताजींच्या धोरणात बदल होणार नसल्याचे जाणवल्यावर नेहरूंनी देखील राजीनामा दिला . त्यामुळे शेवटी कंटाळून नेताजींनीही राजीनामा देऊन पुढे फोरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना केली . 
उपरोक्त सर्व बाबी भाजपा आणि आर एस एस विचारसरणी वाले जाणीवपूर्वक विसरतात . नेताजींना हिंदू महासभेत सामील व्हावेसे वाटले नाही हे भाजपाचे शल्य आहे .आझाद हिंद सेना स्थापन झाल्यावर भारतीयांसाठी रेडियोवरून दिलेल्या संदेशात त्यांनी भारतीय जनतेला गांधीजी  आणि नेहरूजी यांच्या सोबत राहण्याचे आवाहन केले होते त्यात त्यांनी हिंदू महासभा किंवा आर एस एस चे नाव घेतले नव्हते . आझाद हिंद सेनेच्या ब्रिगेड्ना  गांधीजी,नेहरूजी , मौलाना आझाद ह्यांची नावे दिली होती . नेताजी कॉंग्रेस पासून दूर जावू नये म्हणून नेहरूंनी खूप प्रयत्न केले .  नेताजींनी आपल्या धोरणांच्या विषयी गांधीजींशी व्यापक चर्चा करावी असे नेहरूंनी सुचविले होते . १७एप्रिल १९३९ला नेहरूंनी गांधीजींना लिहिलेल्या पत्रात नेताजी बोस ह्यांना कॉंग्रेसचा अध्यक्ष स्विकारावे अशी विनंती केली होती . ह्यावरून या दोन्ही महान नेत्यांमध्ये पदावरून कोणतीही स्पर्धा नसल्याचे जाणवते . 
        पुढील काही महत्वाच्या घटनाच्या तारखा आणि वर्ष यांवर नजर टाकल्यास बऱ्याच गोष्टी समजण्यास सोपे जाईल . १सप्टेंबर १९३९ला जर्मनीने पोलंडवर आक्रमण केल्यावर दुसऱ्या महायुद्धाला सुरवात झाली . १६ जानेवारी १९४१ला ब्रिटीशांच्या हातावर तुरी देऊन नेताजी भारताच्या बाहेर निघून गेले . जून १९४१मध्ये रोम मध्ये तर १३ मे १९४३ला जर्मनीच्या मदतीने टोकियो ला पोहचले . त्यांनी मार्च १९४४ ला आझाद हिंद सेना आणि जपानी सेनेच्या ३ डिव्हिजनच्या मदतीने इम्फाळ वर आक्रमण केले . परंतु अमेरिका आणि इंग्लंड च्या सैन्यासमोर त्यांचा टिकाव लागला नाही व पराभव स्वीकारावा लागला . २८ एप्रिल १९४५ ला मुसोलिनीची हत्या झाली ,हि हत्या चर्चिल ह्यांनी घडवून आणली असावी अशी त्यावेळी चर्चा होती . दोनच दिवसांनी ३०एप्रिल १९४५ हिटलर ने  आत्महत्या केली . ६ आणि ८ऑगस्ट ला अमेरिकेने जपान वर अणुबॉम्ब टाकला व जपान शरण आला . त्याच बरोबर तेथून काम करणारी आझाद हिंद सेनेची लढाई देखील संपुष्टात आली . इंग्लंड ने जर्मनीतील युध्द गुन्हेगारांविरुध्द " न्युरेंबर्ग "येथे तर जपान मधील  युध्द गुन्हेगारांविरुध्द " टोकियो " येथे खटले भरायचे तत्व त्यांच्या संसदेत पास केले . आझाद हिंद चा "चलो दिल्ली "नारा यशस्वी झाला नाही . त्यांच्या सैनिकांना दिल्लीला कैदी म्हणून आणले गेले हे सर्वात जास्त वेदानादाई होते . ३ नोव्हेंबर १९४५ ला नेहरूंनी," आझाद हिंद सेनेच्या सर्व सैनिकांना सोडा व देश स्वतंत्र करा ",असा ब्रिटीश सरकारला जोरदार इशारा दिला . सैनिकांच्या बचावार्थ वकिलांची समिती नेमण्यासाठी मदत केली . कॅपटन शहानवाझ ,कॅपटन पी के सहगल ,लेफ्टनंट गुरुबक्षसिंह धिल्लन यांचे खटले चालू झाले तेव्हा नेहरूंनी स्वतः त्यांची बाजू मांडली . 
नेताजी सुभाष चंद्र बोस ह्यांच्या विमान अपघातात झालेल्या मृत्यूची बातमी १८ऑगस्ट १९४५ला जगाला मिळाली . त्यांच्या या बातमीने दुखः झाले नाही ,रडला नाही असा एकही भारतीय नसेल . १६ जानेवारी १९४१ला भारताच्या बाहेर जाणे ,जर्मनी ,जपान ,व इतर देशांची मदत घेण्याचा निर्णय नेताजींचा  स्वतःचा  होता  . नेहरू त्याला जबाबदार नव्हते . १९४५ मध्ये जेंव्हा नेताजींचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्यावेळी देश स्वतंत्र व्हायला २ वर्षे बाकी होती . दोन वर्षांनी नक्की स्वातंत्र्य मिळेल हे कुणालाही माहित नव्हते . त्यामुळे कॉंग्रेस चे षडयंत्र वगैरे म्हणणे सगळ्या भाजपच्या शुध्द थापा आहेत . 
नेताजींच्या घरावर २० वर्षे पाळत ठेवली जात होती व गृहमंत्रालयाच्या तशा नोंदी आहेत ,असे नेताजींच्या भाच्याचे अभिजित रॉय याचे म्हणणे असल्याचे समजते . १९४७ ते १९६७ पर्यंत पाळत ठेवली गेली असा त्याचा आरोप आहे . या काळात गृह मंत्रालयाचा स्वतंत्र कारभार बघितला जात होता ,तसेच ह्या पाळत ठेवण्याच्या आरोपात देखील काही तथ्य नाही . जनतेच्या माहितीसाठी म्हणून ह्या काळातील गृहमंत्रांची नावे पुढील प्रमाणे आहेत . 
सरदार वल्लभ भाई पटेल  २ सप्टेंबर १९४६ ते १५ डिसेंबर १९५०,
सी राजगोपालचारी  २६डिसेंबर १९५० ते २५ ऑक्टोबर १९५१,
कैलासनाथ काटजू  १९५१ ते १९५५ ,गोविंद वल्लभ पंत १९५५ ते १९६१,
लालबहादूर शास्त्री   ९ जून १९६१ते २९ ऑगस्ट १९६३,
गुलजारीलाल नंदा  २९ऑगस्ट १९६३ते १४नोव्हेम्बर १९६६ ,
यशवंतराव चव्हाण  १४नोव्हेम्बर १९६६ ते २७जून १९७०

ह्यातील गृह मंत्रांच्या नावाकडे नजर टाकल्यास कोणीतरी अशी कामे करेल का असा सवाल जनतेने स्वतःला विचारावा . पंडित नेहरूंचा स्वर्गवास २७ मे १९६४ ला झाला होता ,मग त्यांच्या मृत्यू नंतरही पाळत ठेवावी असे मृत्यू पूर्वी त्यांनी आदेश दिले होते असे भाजपचे म्हणणे आहे काय ? 
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात गांधीजीपेक्षाही जर कुणी तुरुंगवास भोगला असेल तर ते पंडित नेहरू होते . गांधीजींनी त्यांच्या आयुष्यात ६वर्षे १०महिने तर नेहरूंनी ९वर्षे ६महिने तुरुंगवास भोगला .नेहरूंनी इतिहास घडवला व इतिहास लिहिला .नेहरूंनी लिहिलेली पुस्तके  सर्वकालीन वाचनीय आहेत . लेटर्स फ्रॉम फादर टू हिज डॉटर १९२९, ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी १९३४, द डिस्कवरी ऑफ इंडिया १९४६ ह्या पुस्तकांचे आजही तेवढ्याच तन्मयतेने वाचन होते . वयाच्या पंचविशीत बिघडलेल्या पैसेवाल्यांची मुले जे करतात ते नेहरूंनी सुरु केले असते तर त्यांना रोकणारे कुणी होते काय ?ब्रिटीशांची चाकरी ,वकिली ,किंवा काहीही केले असते तर आयुष्यभर बसून खायला मिळेल इतके त्यांच्याकडे होते.  तरी सुखाला लात मारून जाडे भरडे खादीचे कपडे घालून स्वातंत्र्यासाठी लढले . शेतकरी, कामगार ,मागास वर्गीय लोकांच्या प्रगती साठी लढले . मृत्यू पर्यंत हा वसा त्यांनी सोडला नाही . 
नेहरूंच्या मते संघ आणि जनसंघ  ह्या फक्त संघटना नाहीत तर त्या प्रतिगामी ,सनातनी,विचाराने मागास ,उच्च वर्गीय ,उच्च वर्णीय आणि इतिहासाची चाके उलट्या फिरवू पाहणाऱ्या प्रवृत्ती होत्या . ह्या विचारांमुळे भाजपा आणि संघ यांना नेहरू नकोसे आहेत हे काही लपून नाही . नेहरूंच्या लोकशाही वरील आस्थे मुळे १० मार्च १९३८ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट यांनी ब्रिटीश सरकर वर दबाव आणण्यासाठी चर्चिल यांना दिर्घ संदेश पाठविला होता व भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी सुचविले होते . नवी दिल्ली येथील कॅनडाचे उच्च अधिकारी एस्कॉट रीड १९५०मध्ये म्हणाले होते, " नेहरू त्यांच्या देशाचे संस्थापक ,पालक आणि मुक्तिदाते होते ,जॉर्ज वॉशिंगटन,अब्राहम लिंकन ,थिओडोर रूझवेल्ट या तिघांना एकत्र केल्यावर जे काही असेल ते सर्व नेहरू भारतीय राष्ट्रासाठी आहेत . नेहरू आणि त्यांची धर्म निरपेक्ष विचारसरणी भारतात नसती तर आज भारताची अवस्था पाकिस्तानपेक्षा लाचार झाली असती .ऑस्ट्रेलियाचे राजदूत वोल्टर क्रॉकर  यांनी १९६६ मध्ये Nehru : A Contemporary Estimate नेहरू -एक समकालीन परीक्षण यात लिहिले आहे ,ते म्हणतात "माणसात जे सामान्यपण असते किंवा क्षुद्रपणा असतो त्यांचा अंश मात्र ही नसणाऱ्या मोजक्या माणसांपैकी नेहरू होते . आणि जगाच्या इतिहासातील "दया आणि करुणा " यांचा "सत्तेशी मिलाफ" करणाऱ्या अगदी कमी सत्ताधार्यांपैकी ते एक होते ". हे पुस्तक १९६४ ला नेहरूंच्या मृत्यू नंतर दोन वर्षानंतर आलेले आहे . 
नेहरू ,इंदिरा गांधी ,राजीव गांधी ,यांची शक्य तितकी बदनामी करणे ,त्यांच्या नावाच्या योजना बदलणे  किंवा नामांतर करणे ,खोटा प्रचार करून जनमानसात संशय निर्माण करणे ह्या बाबींमुळे मनाला थोडा क्लेश होईल ,परंतु शेवटी भाजप च्या देशासाठी घातक व निरुपयोगी विचारसरणीचा पराभव निश्चित होईल . महात्मा गांधी आणि पंडित नेहरूंनी देशाला धर्मनिरपेक्षतेचा जो पाया घालून दिला तो भुसभुशीत करण्याचे काही प्रवृत्तींचे प्रयत्न आहेत पण त्यात त्यांना अपयश येईल ही काळ्या दगडावरची रेघ आहे .  हेच भारतावरचे संस्कार आहेत . 
  धनंजय जुन्नरकर 
सचिव ,मुंबई काँग्रेस 
9930075444


संदर्भ -
१) Neharu Making of india -M.J.Akbar अनुवाद -करुणा गोखले
२) वेध नेहरू विचार विश्वाचा - संपादन,  किशोर बेडकिहाळ 
३) आझाद हिंद फौजेची कथा - एस ए अय्यर . अनुवाद- म.अ. करंदीकर  
४) नेताजी सुभाष चंद्र बोस - शिशिर कुमार बोस 
५) मानवी हक्कांची ऐतिहासिक वाटचाल ,पुस्तक ०१ यशवंतराव चव्हाण युनिवर्सिटी 

 Displaying FL12_SCI_BOSE_2218896g.jpg